श्री गुरूचरित्र – अध्याय सतरावा

कथासार

॥ अध्याय सतरावा ॥

॥ ब्रह्मचाऱ्यास ज्ञानप्राप्ती ॥

श्रीगणेशाय नमः ॥ सिद्ध म्हणाला, “नामधारका, कृष्णा नदीच्या पश्चिम तीरावर वसलेल्या भिल्लवडी (भिलवडी) गावाजवळ भुवनेश्वरी देवीचे देऊळ आहे. ते एक प्राचीन सिद्धस्थान आहे. तेथे असलेल्या औदुंबरापाशी श्रीगुरुंनी वास्तव्य केले. बहुत काळ ते गुप्तरूपानेच वावरले. ते सामान्य तपस्व्याप्रमाणे स्नानसंध्या करीत, जप-तप-व्रते करीत, गावात हिंडून भिक्षा मागीत, चातुर्मासाचे सर्व दिवस त्यांनी अनुष्ठानातच घालविले.” ते ऐकून नामधारक म्हणाला, “महाराज, श्रीगुरू नृसिंहसरस्वती हे तर परमात्मस्वरूपप्राप्त पूर्ण सिद्ध होते तरीही त्यांनी अनुष्ठाने केली, भिक्षा मागितली, असे त्यांनी का केले?”

सिद्ध म्हणाला, “ज्ञानप्राप्ती झाली तरी तपश्चर्या सोडू नये. समाजात मान्यवर जन जसे आचरण करतात त्याचेच सामान्य लोक अनुसरण करीत असतात हे तू लक्षात घे, भिक्षेविषयी सांगायचे तर ती एक पवित्र वृत्ती आहे. सन्याशांनी परिग्रह न करणे, भिक्षेवरच उदरनिर्वाह करणे आणि सर्व काळ साधनामन राहणे हाच त्या आश्रमाचा धर्म आहे. दत्तात्रेय व शंकर हेही भिक्षा मागतात त्याचे हेच कारण आहे. भिक्षेसाठी हिंडताना निजकृपेने भक्तांचा, दीनआर्तांचा उद्धार करणे हाच मुख्य उद्देश असतो. श्रीगुरू भिलवडीमध्ये गुप्तपणे राहत असले, तरी त्यांची सत्कीर्ती व्हायची ती झालीच. त्यांचे माहात्म्य लोकांत कसे प्रकट झाले ते ऐक.

कोल्हापुरात एक वेदशास्त्रसंपन्न ऋग्वेदी ब्राह्मण राहत होता. त्याला विद्वज्जनामध्ये फार मान होता. त्याचा मुलगा बुद्धिहीन व मूर्ख होता. त्याचे मातापिता तो लहान असतानाच वारले. त्याच्या आप्तांनी त्याचे पालनपोषण केले. कुळाचाराला अनुसरून सातव्या वर्षी त्याची मुंज केली. शिकण्यासाठी अध्यापकांकडे

पाठविले. पण विद्याभ्यास काही येईना शिकवलेले काहीही लक्षात राहत नसे. ब्राह्मणाला विद्या यायलाच हवी त्याशिवाय उदरनिर्वाह कसा होणार? लोक त्याला अडाणी म्हणून हिणवू लागले. तो म्हणायचा, “मी पूर्वजन्मी विद्यादान केले नसेल म्हणून या जन्मात मला विद्याभ्यास येत नाही. त्याला मी तरी काय? आता आपणच काही उपाय करा.” त्यावर लोक हसून म्हणायचे, “तुला पुढच्या जन्मीच विद्या येईल. या जन्मी तू भिक्षेवरच पोट भर.”

अशा प्रकारे सातत्याने अवहेलना होऊ लागल्याने तो ब्राह्मण कुमार अतिशय दुःखी झाला. विद्या येत नाही याची खंत करीत ग्राम सोडून निघाला. त्याच्या मनात एकसारखे आत्महत्येचे विचार येत होते. रात्रीच्या सुमारास तो भिलवडीस आला. तेथे भुवनेश्वरीचे दर्शन घेतले, त्याने अन्नोदक टाकले आणि तिच्यासमोर धरणे धरून बसला. तो जगदंबेला आक्रोश करून सातत्याने विनंती करीत होता “आई, सर्वांनी माझी हेटाळणी केली पण तू तरी उपेक्षा करू नकोस. मला मार्ग दाखव, माझ्यावर कृपा कर.” तीन दिवस लोटले. शेवटी अगदीच निरुपाय झाला तेव्हा तो देवीला म्हणाला, “माते, तू मला स्वप्नात येऊन मार्गदर्शन करशील असे वाटत होते पण तूही पाठ फिरवलीस. आता मी काय करू? कोठे जाऊ? मी तुला माझी जीभच अर्पण करतो. तरीही कृपा केली नाहीस तर हे शीरच तुझ्या चरणी वाहीन.” त्याने खरोखरच आपली जीभ कापली आणि देवीमूर्तींच्या चरणी वाहिली.

READ  श्री गुरूचरित्र – अध्याय बारावा

तो त्याचा निर्धार पाहून देवीला करुणा आली. त्या रात्री त्याच्या स्वप्नात जाऊन ती म्हणाली, “बाळा, ब्रह्मचाऱ्या, तू माझ्यावर रागावू नकोस. कृष्णेच्या पश्चिम तीरावर औदुंबराखाली एक महातपस्वी अवतारी पुरुष वास्तव्यास आहे. तू त्यांना शरण जा. तेच तुझी इच्छा पुरवतील.” त्या दृष्टांताने ब्राह्मण कुमाराला जाग आली, देवीला वंदन करून तो कृष्णा नदीच्या दिशेने धावला. प्रवाहात झेप घेऊन पलीकडे गेला, तेथे औदुंबराखाली श्रीगुरू नृसिंहसरस्वती स्वामी महाराज बसले होते. त्यांना पाहताच त्याला अत्यानंद झाला. त्याने त्यांचे पाय धरले. जीभ नसल्यामुळे त्याला बोलता येत नसले तरी अंतर्ज्ञानी श्रीगुरूंनी त्याचा मनोभाव जाणला होता. त्यांनी आपला वरदहस्त त्याच्या मस्तकी ठेवला. तर काय आश्चर्य त्याला पुन्हा जीभ आली. त्याला वेद, शास्त्रे, पुराणे, तर्कशास्त्र, भाषा, व्याकरण असे सर्व ज्ञान प्राप्त झाले. परीसस्पर्शाने लोखंडाचे सुवर्ण व्हावे तसे श्रीगुरूंच्या पुनीत स्पर्शाने त्या ब्रह्मचाऱ्यास पांडित्य प्राप्त झाले.” सिद्ध म्हणाला, “नामधारका, असा आहे गुरुचा महिमा. ते ज्या ठिकाणी राहतात त्या स्थानालाही महत्त्व प्राप्त होते.”

श्री गुरूचरित्र – अध्याय सतरावा

॥ श्रीगणेशाय नमः ॥ श्रीसरस्वत्यै नमः ॥ श्रीगुरुभ्यो नमः ॥

सिद्ध म्हणे नामकरणी । गुरुभक्तशिखामणि ।
तुझी भक्ति गुरुचरणीं । लीन जाहली निर्धारीं ॥१॥

पर्जन्य येतां पुढारां । जैसा येतो सूचना वारा ।
तैसें तुझें दैन्य-हरा । ऐकसी गुरुचरित्र कथनभेद ॥२॥

ऐसें चरित्र कामधेनु । सांगेन तुज विस्तारोन ।
एकचित्त करुनि मन । ऐक शिष्या नामधारका ॥३॥

कृष्णावेणीतटाकेसी । भुवनेश्वरी-पश्चिमेसीं ।
औदुंबर वृक्षेसीं । राहिले श्रीगुरु परियेसा ॥४॥

गौप्यरुप असती गुरु । ठाव असे अगोचरु ।
अनुष्‍ठान धुरंधरु । चातुर्मास येणेंपरी ॥५॥

सिद्धस्थान असे गहन । भुवनेश्वरीसंनिधान ।
विशेष श्रीगुरु राहिले म्हणोन । उत्कृष्‍ट जाहलें महिमान ॥६॥

ऐकोनि सिद्धाचें वचन । नामधारक करी नमन ।
परमात्मा श्रीगुरुराणा । कां रहावें गौप्यरुपें ॥७॥

त्यासी काय असे तपस । भिक्षा मागणें काय हर्ष ।
संदेह माझ्या मानसास । निवारावा दातारा ॥८॥

ऐक वत्सा नामधारका । भिक्षा मागतो पिनाका ।
आणिक सांगेन ऐका । दत्तात्रेय तैसाचि ॥९॥

दत्तात्रेय त्रयमूर्ति । भिक्षुकरुपी असे दिसती ।
भक्तजनानुग्रहार्थी । तीर्थयात्रे हिंडतसे ॥१०॥

अनुपम तीर्थे भूमीवरी । असती गौप्य अपरांपरीं ।
श्रीगुरुमूर्ति प्रीतिकरीं । प्रगटले भक्तांलागीं ॥११॥

भक्तजनोपकारार्थ । तीर्थे हिंडे श्रीगुरुनाथ ।
गौप्य व्हावया कारणार्थ । समस्त येऊनि मागती वर ॥१२॥

लपवितां दिनकरासी । केवीं लपे तेजोराशी ।
कस्तूरी ठेवितां जतनेसी । वास केवीं गौप्य होय ॥१३॥

आणिक सांगेन तुज साक्षी । गुण कैसा कल्पवृक्षीं ।
जेथें राहे तया क्षितीकांक्षी । कल्पिलें फळ तेथें होय ॥१४॥

याकारणें तया स्थानीं । प्रगटले गुरुमुनि ।
सांगेन तुज विस्तारुनि । एकचित्तें परियेसा ॥१५॥

करवीरक्षेत्र नगरांत । ब्राह्मण एक वेदरत ।
शास्त्रपुराण विख्यात । सांगे सकळ विद्वज्जनां ॥१६॥

READ  श्री गुरूचरित्र – अध्याय तिसावा

अग्रवेदी असे आपण । जाणे तर्क व्याकरण ।
आन्हिकप्रमाण आचरण । कर्ममार्गी रत होता ॥१७॥

त्यासी जाहला एक सुत । मूर्ख असे उपजत ।
दैववशें मातापिता मृत । असमाधान होऊनियां ॥१८॥

वर्धतां मातापित्याघरीं बाळ । वर्षे सात जाहलीं केवळ ।
व्रतबंध करिती निश्चळ । तया द्विजकुमरकासी ॥१९॥

न ये स्नानसंध्या त्यासी । गायत्रीमंत्र परियेसीं ।
वेद कैंचा मूर्खासी । पशूसमान जहाला असे ॥२०॥

जेथें सांगती अध्ययन । जाऊनि आपण शिकूं म्हणे ।
तावन्मात्र शिकतांचि क्षण । सवेंचि विस्मृति होय त्यासी ॥२१॥

त्या ग्रामींचे विद्वज्जन । निंदा करिती सकळै जन ।
विप्रकुळीं जन्मून । ऐसा मूर्ख उपजलासी ॥२२॥

तुझा पिता ज्ञानवंत । वेदशास्त्रादि अभिज्ञात ।
त्याचे पोटीं कैसा केत । उपजलासी दगडापरी ॥२३॥

जळो जळो तुझें जिणें । पित्याच्या नामा आणिलें उणें ।
पोटीं बांधूनि पाषाण । तळें विहीरी कां न करिसी ॥२४॥

जन्मोनियां संसारीं । वृथा जाहलासी सूकरापरी ।
तुज गति यमपुरीं । अनाचारें वर्तसी ॥२५॥

ज्यासी विद्या असे ऐका । तोचि मनुष्यांमध्यें अधिका ।
जेवीं द्रव्य असे निक्षेपिका । तैसी विद्या परियेसा ॥२६॥

ज्याचे ह्रदयीं असे विद्या । त्यासी अखिल भोग सदा ।
यशस्वी होय सुखसंपदा । समस्तांमध्यें पूज्य तोचि ॥२७॥

श्रेष्‍ठ असे वयें थोर । विद्याहीन अपूज्य नर ।
अश्रेष्‍ठ असे एखादा नर । विद्या असतां पूज्यमान ॥२८॥

ज्यासी नाहीं सहोदर । त्यासी विद्या बंधु-भ्रातर ।
सकळिकां वंद्य होय नर । विद्या असे ऐशागुणें ॥२९॥

एखादे समयीं विदेशासी । जाय नर विद्याभ्यासी ।
समस्त पूजा करिती त्यासी । विदेश होय स्वदेश ॥३०॥

ज्यासी विद्या असे बहुत । तोचि होय ज्ञानवंत ।
त्याचे देहीं देवत्व । पूजा घेई सकळांपाशीं ॥३१॥

एखाद्या राज्याधिपतीसी । समस्त वंदिती परियेसीं ।
ऐसा राजा आपण हर्षी । विद्यावंतासी पूजा करी ॥३२॥

ज्याचे पदरीं नाहीं धन । त्याचें विद्याच धन जाण ।
विद्या शिकावी याचिकारण । नेणता होय पशूसमान ॥३३॥

ऐकोनि ब्राह्मणांचें वचन । ब्रह्मचारी करी नमन ।
स्वामींनीं निरोपिलें ज्ञान । विद्याभ्यास करावया ॥३४॥

जन्मांतरीं पूर्वी आपण । केलें नाहीं विद्यादान ।
न ये विद्या याचि कारण । त्यासी काय करणें म्हणतसे ॥३५॥

ऐसा आपण दोषी । उद्धरावें कृपेसीं ।
जरी असेल उपाय यासी । निरोपावें दातारा ॥३६॥

परिहासकें ते ब्राह्मण । सांगताति हांसोन ।
होईल पुढें तुज जनन । तधीं येईल तुज विद्या ॥३७॥

तुज कैंचा विद्याभ्यासु । नर नव्हेसि तूं साच पशु ।
भिक्षा मागूनि उदर पोस । अरे मूर्खा कुळनाशका ॥३८॥

ऐसें नानापरी नीचोत्तरेसीं । बोलती द्विज लोक त्यासी ।
वैराग्य धरुनि मानसीं । निघाला बाळ अरण्यासी ॥३९॥

READ  श्री गुरूचरित्र – अध्याय बाविसावा

मनीं झाला खेदें खिन्न । म्हणे त्यजीन आपुला प्राण ।
समस्त करिती दूषण । काय उपयोग जीवूनियां ॥४०॥

जळो जळो आपुलें जिणें । पशु झालों विद्याहीन ।
आतां वांचोनि काय कारण । म्हणोनि निघाला वैराग्यें ॥४१॥

भिल्लवडीग्रामासी । आला ब्रह्मचारी परियेसीं ।
अन्नोदक नेघे उपवासी । पातला निशीं दैववशें ॥४२॥

जेथें असे जगन्माता । भुवनेश्वरी विख्याता ।
तेथें पातला त्वरिता । करी दर्शन तये वेळीं ॥४३॥

न करी स्नान संध्या देखा । अपार करीतसे दुःखा ।
देवद्वारासन्मुखा । धरणें घेतलें तया वेळीं ॥४४॥

येणेंपरी दिवस तीनी । निर्वाण मन करुनि ।
अन्नोदक त्यजूनि । बैसला तो द्विजकुमर ॥४५॥

नव्हे कांहीं स्वप्न त्यालागोनि । म्हणोनि कोपे बहु मनीं ।
म्हणे अंबा भवानी । कां उपेक्षिसी आम्हांसी ॥४६॥

आक्रोशोनि तये वेळीं । शस्त्रें घेऊनियां प्रबळी ।
आपुली जिव्हा तात्काळी । छेदूनि वाहे देवीचरणीं ॥४७॥

जिव्हा वाहोनि अंबेसी । मागुती म्हणे परियेसीं ।
जरी तूं मज उपेक्षिसी । वाहीन शिर तुझे चरणीं ॥४८॥

ऐसें निर्वाण मानसीं । क्रमिता झाला तो निशी ।
स्वप्न जाहलें तयासी । ऐका समस्त श्रोते जन ॥४९॥

“ऐक बाळा ब्रह्मचारी । नको आक्रोशं आम्हांवरी ।
असे कृष्णापश्चिमतीरीं । त्वरित जाय तयाजवळी ॥५०॥

औदुंबरवृक्षातळीं । असे तापसी महाबळी ।
अवतारपुरुष चंद्रमौळी । तुझी वांछा पुरवील” ॥५१॥

ऐसें स्वप्न तयासी । जाहलें अभिनव परियेसीं ।
जागृत होतांचि हर्षी । निघाला त्वरित तेथोनि ॥५२॥

निघाला विप्र त्वरित । पोहत गेला प्रवाहांत ।
पैलतटा जाऊनि त्वरित । देखता जाहला श्रीगुरुसी ॥५३॥

चरणांवरी ठेवूनि माथा । करी स्तोत्र अत्यंता ।
श्रीगुरुमूर्ति संतोषतां । आश्वासिती तया वेळीं ॥५४॥

संतोषोनि श्रीगुरुमूर्ति । माथां हस्त ठेविती ।
ज्ञान जाहलें त्वरिती । जिव्हा आली तात्काळ ॥५५॥

वेद-शास्त्र-पुराण । तर्क भाषा व्याकरण ।
समस्त त्याचें अंतःकरण । पूर्ण जाहलें तात्काळीं ॥५६॥

जैसा मानससरोवरास । वायस जातां परियेस ।
जैसा होय राजहंस । तैसें झालें विप्रकुमरा ॥५७॥

चिंतामणि-संपर्केसीं । सुवर्ण होय लोह कैसी ।
मृत्तिका पडतां जांबूनदीसी । सुवर्ण होय जेवीं देखा ॥५८॥

तैसें तया ब्राह्मणासी । गुरुचरण होतां स्पर्शी ।
आली अखिल विद्या त्यासी । वेदशास्त्रादि तर्क भाषा ॥५९॥

सिद्ध म्हणे नामधारका । श्रीगुरुमहिमा ऐसी ऐका ।
जे जे स्थानीं वास देखा । स्थानमहिमा ऐसी असे ॥६०॥

म्हणोनि सरस्वती-गंगाधर । सांगे श्रीगुरुचरित्रविस्तार ।
ऐकतां होय मनोहर । सकळाभीष्‍ट साधती ॥६१॥

इति श्रीगुरुचरित्रामृते परमकथाकल्पतरौ श्रीनृसिंहसरस्वत्युपाख्याने सिद्ध-नामधारकसंवादे भिल्लवडीस्थानमहिमावर्णनं-मंदमतिब्राह्मणवरप्रदानं नाम सप्तदशोऽध्यायः ॥१७॥

॥ श्रीगुरुदेव दत्त ॥ ॥ ओंवीसंख्या ६१ ॥

॥श्रीगुरुदत्तात्रेयार्पणमस्तु॥

(PDF) Download श्री गुरूचरित्र – अध्याय सतरावा
Gurucharitra Adhyay 17 (गुरुचरित्र अध्याय १७) with Marathi Subtitles
श्री गुरूचरित्र – अध्याय सतरावा

श्री गुरूचरित्र – अध्याय अठरावा वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

टीप: माहिती शोधण्यासाठी आणि लिहिण्यासाठी योग्य ती काळजी घेण्यात आली आहे. तरी तुम्हाला काही त्रुटी आढळल्यास कृपया कंमेंट्सद्वारे किंवा कॉन्टॅक्ट फॉर्म द्वारे आम्हाला कळवा.

Leave a Comment