श्री गुरूचरित्र – अध्याय एकविसावा

कथासार

॥ अध्याय एकविसावा ॥

॥ मृत विप्रपुत्र पुन्हा जिवंत झाला ॥

श्रीगणेशाय नमः ॥ सिद्ध म्हणाला, “नामधारका, ब्रह्मचाऱ्याने मृत बालकाच्या मातेचे अर्थात गंगाधराच्या पत्नीचे मृदू वचनांनी सांत्वन केले. तो म्हणाला, “बाई गं, या भूलोकी जन्मलेल्या प्रत्येकाला आज न उद्या जायचेच आहे. कोणी आधी जातो, कोणी नंतर. उत्पत्ती व नाश हे सृष्टिचक्र अव्याहत चालूच आहे. मायेच्या अचिंत्य प्रभावाने मनामध्ये ममत्व निर्माण होते. या भ्रांतीनेच कन्या, पुत्र, पत्नी, मित्र यांची आसक्ती उत्पन्न होते. सर्व प्रकारचे प्राणी आपापल्या पूर्वकर्माप्रमाणे उत्पन्न होतात आणि देह प्रारब्ध भोगतात. मृत्यूनंतर जीवात्मा पुन्हा नवीन देह धारण करतो. अर्थात व्यक्ताचे अव्यक्त होणे आणि अव्यक्ताचे व्यक्त होणे हा क्रम चालूच असतो. म्हणून जे ज्ञानी आहेत ते मनुष्याच्या जन्माचे व मृत्यूचे सुखदुःख मानीत नाहीत. अज्ञानी माणसे मात्र मायामोहामुळे नाती जोडून सुखदुःखे भोगतात. तुझेही अनेक जन्म झालेले आहेत. त्या वेळी कोणीतरी तुझे माता, पिता, बंधू, सोयरे असणारच. त्यांच्या वियोगाचे दुःख तू आज करतेस काय? मग या जन्मात पुत्रवियोग झाला म्हणून रडण्यात काय अर्थ आहे? हा देह अस्थिमांसाचा नश्वर गठ्ठा आहे, मलमूत्राचे अगर आहे, घृणास्पद आहे. त्याची आसक्ती धरू नकोस. हे कलेवर अंत्यसंस्कारासाठी देऊन टाक.”

ब्राह्मणी म्हणाली, “महाराज, तुमचे म्हणणे मला पटते पण ते स्वीकारण्याचे धैर्य माझ्यात नाही. नृसिंहसरस्वती स्वामी महाराज म्हणजे दत्तात्रेयांचा अवतार. पाच पुत्र गमावल्याचे दुःख मी भोगले आहे. मी त्यांना शरण गेले. त्यांनी मला अभय दिले. तुझी संतती ज्ञानी आणि दीर्घायुषी होईल असा मला आशीर्वाद दिला. त्यामुळे मी निश्चिंत झाले. पण आज माझा पुत्र मेला. माझ्या विश्वासाला तडा गेला. आता मी प्राणार्पणच करणार.”

ब्राह्मणीचा निश्चय अटळ होता. त्या मातेची मनोवस्था जाणून ब्रह्मचारी म्हणाला, “श्रीगुरूंच्या आशीर्वादानुसार तुझा पुत्र पूर्णायुषी झाला नाही याचे तुला दुःख वाटणे साहजिक आहे. तो विश्वास ढळू देऊ नकोस. पुत्राचे कलेवर घेऊन औदुंबर क्षेत्री जा. त्याच्याबाबतीत जे योग्य आहे ते श्रीगुरू करतीलच.”

त्याच्या आश्वासक बोलण्याने ब्राह्मणीला धीर आला. मुलाचे शव पाठीला बांधून तो औदुंबर क्षेत्री गेली. आपल्या बाळाला श्रीगुरुंच्या पादुकांजवळ ठेवले. श्रीगुरूंनी तिला येथेच वरदान दिले होते. तो प्रसंग आठवून ती अनिवार शोकाने आक्रोश करू लागली. गुरुपादुकांवर डोके आपटून रडू लागली. पादुका रक्ताने माखल्या तिचा पती व आप्तजनही बरोबर आले होते. त्यानी तिची वारंवार समजूत काढली. अंत्यसंस्कारासाठी प्रेताची मागणी केली. पण ती ऐकेचना. रात्र झाली. लोक तिच्या हट्टाला अक्षरशः कंटाळले. ‘उद्या सकाळी काय करायचे ते ठरवू’ असा विचार करून मुक्कामी गेली. ब्राह्मण व ब्राह्मणी कलेवराचे रक्षण करीत तेथेच शोक करीत बसून राहिली. तिसऱ्या प्रहरी ब्राह्मणीला ग्लानीने गाढ झोप लागली. तेव्हा तिला एक स्वप्न पडले. तिला स्वप्नामध्ये जटा, भस्म व रुद्राक्ष धारण केलेला, व्याघ्रचर्म पांघरलेला, त्रिशूलधारी असा एक दिव्य शिवयोगी दिसला. तो तिला म्हणाला, “मुली, तू मला व्यर्थ दोष देत आहेस. तुझ्या मुलाला काय झाले आहे? थांब, मी त्याला जिवंत करतो.” मग त्याने झोळीतील भस्म मुलाच्या सर्वांगास लावले. त्याच्या मुखात प्राणवायूचा संचार केला आणि ‘हा पाहा मी तुझा पुत्र जिवंत केला आहे’ असे म्हणून तो क्षणार्धात अदृश्य झाला.

ब्राह्मणी खडबडून जागी झाली. तिने प्रेताकडे पाहिले तर काय आश्चर्य! तो मुलगा हळूहळू उठून बसला. धावत आईपाशी आला आणि म्हणाला, “मला भूक लागली आहे. दूध दे ना.” ब्रह्माणीचा व तिच्या पतीचा डोळ्यांवर विश्वासच बसेना. त्यांनी त्याला छातीशी कवटाळून अश्रूंनी न्हाऊ घातले. त्या सुखाचे काय वर्णन करावे? ब्राह्मणीने मुलाला यथेच्छ स्तनपान दिले. श्रीगुरूंबद्दलच्या कृतज्ञभावाने तिचे अंतःकरण भरून आले होते. त्या दोघांनी औदुंबराला प्रदक्षिणा घातली. श्रीगुरूंची अपार स्तुती केली. मग गंगेत स्नान केले. रक्ताळलेल्या पादुका स्वच्छ धुतल्या. त्यांची पूजा केली. दीप लावला. औदुंबराला पाणी घालून ते दांपत्य भावभक्तीने गुरुभजन करू लागले. सकाळी त्यांची आप्तमंडळी प्रेतावर संस्कार करण्यासाठी तेथे आली. गंगाधराचा पुत्र जिवंत झालेला पाहून सर्वांना मोठे आश्चर्य वाटले. त्यांनी श्रीगुरूंचा उत्स्फूर्त जयजयकार केला.”

READ  श्री गुरूचरित्र – अध्याय चोविसावा

सिद्ध म्हणाला, “नामधारका, असा आहे औदुंबर गुरुस्थानाचा महिमा, येथे औदुंबराला पाणी घालणे, प्रदक्षिणा घालणे, पादुकापूजन, ग्रंथवाचन, ब्राह्मणसंतर्पण, होमहवन, दानधर्म, जप या गोष्टी श्रीगुरूंच्या प्रीत्यर्थं केल्याने त्यांची प्रसन्नता लाभून भाविकांचे मनोरथ पूर्ण होतात. औदुंबर हे त्रिभुवन कीर्तीचे गुरुपीठ आहे. या अत्यंत पवित्र स्थानी उपासना केल्याने भाविकांचे कल्याण होते.”

श्री गुरूचरित्र – अध्याय एकविसावा

॥ श्रीगणेशाय नमः ॥

सिद्ध म्हणे नामधारका । ब्रह्मचारी कारणिका ।
उपदेशी ज्ञान निका । तये प्रेतजननीसी ॥१॥

ब्रह्मचारी म्हणे नारीसी । मूढपणे दुःख करिसी ।
कोण वाचला धरणीसी । या संसारी सांग मज ॥२॥

उपजला कोण मेला कोण । उत्पत्ति झाली कोठोन ।
जळात उपजे जैसा फेण । बुदबुद राहे कोठे स्थिर ॥३॥

जैसा देह पंचभूती । मिळोनि होय आकृति ।
वेगळी होता पंचभूती । अव्यक्त होय देह जाण ॥४॥

तया पंचभूतांचे गुण । मायापाशी वेष्टोन ।
भ्रांति लाविली मी देह म्हणोन । पुत्रमित्रकलत्रमिषे ॥५॥

सत्त्व रज तमोगुण । तया भूतांपासोन ।
वेगळाली केली लक्षण । होती ऐका एकचित्ते ॥६॥

देवत्व होय सत्त्वगुण । रजोगुण मनुष्य जाण ।
दैत्यांसी तमोगुण । गुणानुसारे कर्मे घडती ॥७॥

जेणे कर्मे आचरती । सुकृत अथवा दुष्कृति ।
तैशीच होय फळप्राप्ति । आपुले आपण भोगावे ॥८॥

जैसी गुणाची वासना । इंदिये तयाधीन जाणा ।
मायापाशी वेष्टोनि गहना । सुखदुःखे लिप्त करिती ॥९॥

या संसारवर्तमानी । उपजती जंतु कर्मानुगुणी ।
आपल्या आर्जवापासोनि । सुखदुःखादि भोगिती ॥१०॥

कल्पकोटी वरुषे ज्यांसी । असती आयुष्ये देवऋषि ।
न सुटे कर्म तयासी । मनुष्याचा कवण पाड ॥११॥

एखादा नर देहाधीन । काळ करी आपुले गुण ।
कर्म होय अनेक गुण । देहधारी येणेपरी ॥१२॥

जो असे देहधारी । तयासी विकार नानापरी ।
स्थिर नव्हे तो निर्धारी । आपुले पाप म्हणावया ॥१३॥

या कारणे ज्ञानवंत । संतोष न करी उपजत ।
अथवा नरा होय मृत्यु । दुःख आपण करू नये ॥१४॥

जधी गर्भसंभव होता । काय दिसे आकारता ।
अव्यक्त दिसे व्यक्तता । सवेचि होय अव्यक्त पै ॥१५॥

बुदबुद निघती जैसे जळी । सवेचि नष्ट तात्काळी ।
तैसा देह सर्वकाळी । स्थिर नव्हे सर्वथा ॥१६॥

जधी गर्भप्रसव झाले । विनाशी म्हणोनि जाणिले ।
कर्मानुबंधे जैसी फळे । तैसे भोगणे देहासी ॥१७॥

कोणी मरती पूर्ववयेसी । अथवा मरती वृद्धपणेसी ।
आपुले अर्जिती असती जैशी । तेणेपरी घडे जाण ॥१८॥

मायापाशी वेष्टोनि । म्हणती पिता सुत जननी ।
कलत्र मित्र तेणे गुणी । आपुले आपुले म्हणती मूढ ॥१९॥

निर्मळ देह म्हणो जरी । उत्पत्ति मांसरुधिरी ।
मळमूत्रांत अघोरी । उद्‌भव झाला परियेसा ॥२०॥

कर्मानुसार उपजतांची । ललाटी लिहितो विरंची ।
सुकृत अथवा दुष्कृतेची । भोग भोगणे म्हणोनि ॥२१॥

ऐसे कर्म काळासी । जिंकिले नाही परियेसी ।
या कारणे देहासी । नित्यत्व नाही परियेसा ॥२२॥

स्वप्नी निधान दिसे जैसे । कोणी धरावे भरवसे।
इंद्रजाल गारूड जैसे । स्थिर केवी मानिजे ॥२३॥

तुझे तूचि सांग वहिले । कोटी वेळा जन्म झाले ।
मनुष्य किंवा पशुत्व लाधले । पक्षी अथवा कृमिरूप ॥२४॥

जरी होतीस मनुष्ययोनी । कोण कोणाची होतीस जननी ।
कोण कोणाची होतीस गृहिणी । सांग तुझे त्वा निश्चये ॥२५॥

कवण तुझी मातापिता । जन्मांतरींची सांग आता ।
वाया दुःख करिसी वृथा । पुत्र आपुला म्हणोनि ॥२६॥

पंचभूतात्मक देह । चर्ममांस-अस्थि-मज्जा -समूह ।
वेष्टोनिया नव देह । मळबद्ध शरीर नावे ॥२७॥

कैचा पुत्र कोठे मृत्यु । वाया भ्रमोनि का रडत ।
सांडोनि द्यावे कैचे प्रेत । संस्कारिती लौकिकार्थ ॥२८॥

READ  श्री गुरूचरित्र – अध्याय आठवा

येणेपरी ब्रह्मचारी । सांगे तत्त्व विस्तारी ।
परिसोनिया विप्रनारी । विनवितसे तयासी ॥२९॥

विप्रवनिता तये वेळी । विनवीतसे करुणा बहाळी ।
स्वामी निरोपिले धर्म सकळी । परी स्थिर नव्हे अंतःकरण ॥३०॥

प्रारब्ध प्रमाण म्हणो जरी । तरी का भजावा श्रीहरी ।
परीस संपर्क लोह जरी । सुवर्ण न होय कोण बोले ॥३१॥

आम्ही पहिले दैवहीन । म्हणोनि धरिले श्रीगुरुचरण ।
अभय दिधले नाही मरण । म्हणोनि विश्वासलो आम्ही ॥३२॥

एखाद्या नरा येता ज्वर । धुंडीत जाय वैद्यघर ।
औषध घेवोनि प्रतिकार । सवेचि करिती आरोग्यता ॥३३॥

एके समयी मनुष्यासी । आश्रय करिती करुणेसी ।
साह्य होय भरंवसी । आली आपदा परिहारी ॥३४॥

त्रयमूतीचा अवतार । श्रीनृसिंहसरस्वती असे नर ।
तेणे दिधला असे वर । केवी असत्य होय सांगे ॥३५॥

आराधिले म्या तयासी । वर दिधला गा मजसी ।
त्याचा भरवसा मानसी । धरोनि होते स्वस्थचित्त ॥३६॥

विश्वासुनी असता आपण । केवी केले निर्माण ।
कैसे झाले माझे मूर्खपण । म्हणोनि स्वामी निरोपिसी ॥३७॥

याकारणे आपण आता । प्राण त्यजीन तत्त्वता ।
देह समर्पीन श्रीगुरुनाथा । वाढो कीर्ति तयाची ॥३८॥

ऐकोनि तियेचे वचन । ओळखून भाव मन ।
सांगे बुद्धि तीस ज्ञान । उपाय यासी करी आता ॥३९॥

विश्वास केला श्रीगुरूसी । पुत्र लाधला पूर्णायुषी ।
जरी आला मृत्यु त्यासी । घेवोनि जाय गुरुस्थाना ॥४०॥

जेथे लाधला तुज वर । तेथे ठेवी कलेवर ।
पंचगंगाकृष्णातीर । औदुंबरवृक्षातळी ॥४१॥

ऐसे वचन ऐकोनि । विश्वास झाला तिचे मनी ।
पाठी शव बांधोनि । घेवोनि गेली औदुंबरा ॥४२॥

जेथे होत्या गुरुपादुका । आफळी शिर ते बालिका ।
रुधिरे भरल्या त्या पादुका । आक्रोशे रडे ती नारी ॥४३॥

समस्त शोकाहुनी अधिक । साहवेना पुत्रशोक ।
क्षयरोग तोचि एक । मातापितया मृत्युमूळ ॥४४॥

ऐसे करिता झाली निशी । विप्र मागती प्रेतासी ।
म्हणती आक्रोश का हो करिसी । संस्कारोनि जाऊ आता ॥४५॥

मनुष्य नाही अरण्यात । केवी राहू जाऊ म्हणत ।
जळू दे वो आता प्रेत । अहो कर्कशा म्हणे ती ज्ञाती ॥४६॥

काही केलिया नेदी प्रेत । आपणासवे जाळा म्हणत ।
पोटी बांधोनिया प्रेत । लोळतसे पादुकांवरी ॥४७॥

म्हणती विप्र ज्ञाती लोक । राहो नये रानी ऐक ।
तस्करबाधा होईल देख । जाऊ आता घरासी ॥४८॥

जाऊ स्नान करूनि । उपवास होय आजच्या दिनी ।
प्रातःकाळी येवोनि । दहन करू म्हणताती ॥४९॥

आजिचे रात्री प्रेतासी । सुटेल वास दुर्गंधीसी ।
देईल आपोआप दहनासी । त्रासून जाणा कर्कशा ॥५०॥

म्हणोनि निघती सकळ लोक । राहिले तेथे जननीजनक ।
प्रेत देखोनि करिती शोक । झाली रात्री परियेसा ॥५१॥

निद्रा नाही दिवस दोन्ही । शोक करिती जनकजननी ।
तीन याम होता रजनी । झोप आली तियेसी ॥५२॥

देखतसे सुषुप्तीत । जटाधारी भस्मोध्दूलित ।
व्याघ्रचर्मे परिधानित । रुद्राक्षमाळा सर्वांगी ॥५३॥

योगदंड त्रिशूळ हाती । आले औदुंबराप्रति ।
का हो शोक करिसी सती । आक्रोशोनि आम्हांवरी ॥५४॥

काय झाले तुझिया कुमारा । करू त्यासी प्रतिकारा ।
म्हणोनि दे तो अभय करा । भक्तवत्सला श्रीगुरु ॥५५॥

भस्म काढोनि प्रेतासी । लावीतसे सर्वांगासी ।
मुख पसरी म्हणे तिसी । वायुपूर करू म्हणे ॥५६॥

प्राण म्हणे वायु जाण । बाहेर गेला निघोन ।
घातला मागुती आणून । पुत्र तुझा जीवंत होय ॥५७॥

इतुके देखोनि भयचकित । झाली नारी जागृत ।
म्हणे आपणा कैसी भ्रांत । पडिली असे प्रेतावरी ॥५८॥

जे का वसे आपुले मनी । तैसेचि दिसे निद्रास्वप्नी ।
कैचा देव नृसिंहमुनि । भ्रांति आपणा लागलि असे ॥५९॥

READ  श्री गुरूचरित्र – अध्याय बाविसावा

आमुचे प्रारब्ध असे उणे । देवावरी बोल काय ठेवणे ।
अज्ञान आम्ही मूर्खपणे । श्रीगुरूवरी बोल काय ॥६०॥

येणेपरी चिंता करीत । तव प्रेतासी झाले चेत।
सर्वांगही उष्ण होत । सर्वसंधी जीव आला ॥६१॥

म्हणे प्रेता काय झाले । किंवा भूत संचारले ।
मनी भय उपजले । ठेवी काढोनि दूर परते ॥६२॥

सर्व संधीसी जीव आला । बाळ उठोनि बैसला ।
म्हणे क्षुधा लागली मला । अन्न दे की म्हणे माते ॥६३॥

रुदन करीतसे तये वेळी । आला कुमार मातेजवळी ।
स्तन घालिता मुखकमळी । क्षीर निघे बत्तीस धारा ॥६४॥

संतोश भय होऊनि तिसी । संदेह वाटे मानसी ।
कडे घेऊनि बाळकासी । गेली आपुल्या पतीजवळी ॥६५॥

जागृत करूनि पतीसी । सांगे वृत्तान्त तयासी ।
पति म्हणे तियेसी । ऐसे चरित्र श्रीगुरूचे ॥६६॥

म्हणोनि दंपत्य दोघे जाणा । करोनि औदुंबरी प्रदक्षिणा ।
साष्टांग नमुनी चरणा । नानापरी स्तोत्रे करिती ॥६७॥

जय जयाजी वरदमूर्ति । ब्रह्मा विष्णु शिवयती ।
भक्तवत्सला तुझी ख्याति । वासना पहासी भक्तांची ॥६८॥

तू तारक विश्वासी । म्हणोनि भूमी अवतरलासी ।
अशक्य तूते वर्णावयासी क्षमा करणे स्वामिया ॥६९॥

बाळ जैसे कोपेसी । निष्ठुर बोले मातेसी ।
तैसे अविद्यामायापाशी । तुम्हा निष्ठुर बोलिलो ॥७०॥

सर्वस्वी आम्हा क्षमा करणे । म्हणोनि घालिती लोटांगणे ।
विनवोनिया करुणावचने । गेली स्नानासी गंगेत ॥७१॥

स्नान करोनि बाळकासहित । धुती झाली पादुकांचे रक्त ।
औदुंबरा स्नपन करीत । लाविती दीप तये वेळी ॥७२॥

पूजा करिती भक्तीसी । मंत्रपूर्वक विधींसी ।
शमीपत्र कुसुमेसी । पूजा करिती परियेसा ॥७३॥

नीरांजन तये वेळा । करिती गायन परिबळा ।
अतिसंतोषी ती अबला । भक्तिभावे स्तुति करीत ॥७४॥

इतुके होय तो गेली निशी । उदय झाला दिनकरासी ।
संस्कारू म्हणोनि प्रेतासी । आले विप्र ज्ञाती सकळ ॥७५॥

तव देखती कुमारासी । विस्मय झाला सकळिकांसी ।
समाधान करिती हर्षी । महा आनंद वर्तला ॥७६॥

ऐसा श्रीगुरुस्थानमहिमा । अखिल लोक लाधले कामा ।
एकेकाची सांगता महिमा । विस्तार होईल बहु कथा ॥७७॥

पुत्रप्राप्ति वांझेसी । श्रीप्राप्ति दारिद्र्यासी ।
आरोग्य होईल रोगियासी । अपमृत्यु न ये जाणा ॥७८॥

सिद्ध म्हणे नामधारका । स्थानमहिमा ऐशी ऐका ।
अपार असे सांगता देखा । साधारण निरोपिले ॥७९॥

तया औदुंबरातळी । श्रीगुरु वसे सर्वकाळी ।
काम्य होत तात्काळी । आराधिता नरहरीसी ॥८०॥

भाव असावा आपुले मनी । पूजा करावी श्रीगुरुचरणी ।
जी जी वासना ज्याचे मनी । त्वरित होय परियेसा ॥८१॥

ह्रदयशूळ गंडमाळ । अपस्मार रोग सकळ ।
परिहरती तात्काळ । श्रीगुरुपादुका अर्चिता ॥८२॥

जो असेल मंदमति । बधिर मुका चरण नसती ।
औदुंबरी सेवा करिती । सुदेह होय सत्य माना ॥८३॥

चतुर्विध पुरुषार्थ । तेथे होय निश्चित ।
प्रत्यक्ष वसे श्रीगुरुनाथ । औदुंबरी सनातन ॥८४॥

तया नाव कल्पतरू । प्रत्यक्ष झाणा औदुंबरू ।
जे जे मनी इच्छिती नरू । साध्य होय परियेसा ॥८५॥

किती वर्णू तेथील महिमा । सांगता अशक्य असे आम्हा ।
श्रीगुरुसरस्वती नामा । प्रख्यात असे परियेसा ॥८६॥

गंगाधराचा नंदन । सांगे गुरुचरित्र विस्तारोन ।
भक्तिपूर्वक ऐकती जे जन । सकलाभीष्टे पावती ॥८७॥

म्हणोनि सरस्वतीगंगाधर । सदा श्रीगुरुचरणी स्थिर ।
उतरवी पैलपार । इहसौख्य परगति ॥८८॥

इति श्रीगुरुचरित्रामृत । गुरुमाहात्म्यपरमामृत ।
विप्रपुत्रसंजीवनामृत । निरोपिले असे येथे ॥८९॥

इति श्रीगुरुचरित्रपरमकथाकल्पतरौ श्रीनृसिंहसरस्वत्युपाख्याने सिद्धनामधारकसंवादे बालसंजीवन नाम एकविंशोऽध्यायः ॥२१॥

॥ ओवीसंख्या ॥८९॥

॥श्रीगुरुदत्तात्रेयार्पणमस्तु॥

(PDF) Download श्री गुरूचरित्र – अध्याय एकविसावा
Gurucharitra Adhyay 21 गुरुचरित्र अध्याय २१
श्री गुरूचरित्र – अध्याय एकविसावा

श्री गुरूचरित्र – अध्याय बाविसावा वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

टीप: माहिती शोधण्यासाठी आणि लिहिण्यासाठी योग्य ती काळजी घेण्यात आली आहे. तरी तुम्हाला काही त्रुटी आढळल्यास कृपया कंमेंट्सद्वारे किंवा कॉन्टॅक्ट फॉर्म द्वारे आम्हाला कळवा.

Leave a Comment