श्री गुरूचरित्र – अध्याय अठ्ठेचाळीसावा

कथासार

॥ अध्याय अठ्ठेचाळिसावा ॥

॥ श्रीगुरूंच्या कृपाप्रसादाने उदंड पीक आले ॥

श्रीगणेशाय नमः ॥ सिद्धाने नामधारकाला श्रीगुरुची आणखी एक लीला सांगितली. तो म्हणाला, “श्रीगुरू रोज सकाळी संगमावर अनुष्ठानासाठी जात असत. त्यांच्या जाण्यायेण्याच्या मार्गावर एका शूद्राचे शेत होते. श्रीगुरूंना पाहताच तो हातातले काम टाकून धावत यायचा आणि त्यांना साष्टांग वंदन करून पुन्हा शेतात जायचा. मध्यान्हसमयी श्रीगुरू मठात परतायचे, तेव्हाही त्यांना सन्मुख जाऊन वंदन करायचा. श्रीगुरू त्याच्याशी कधीच बोलत नसत. अशा प्रकारे अनेक दिवस हा नमस्काराचा क्रम चालू होता.

एके दिवशी श्रीगुरू त्याला म्हणाले, “तू मला रोज नमस्कार करतोस. तुझ्या मनात काय इच्छा आहे?” शूद्र म्हणाला, “देवा, या माझ्या शेतात उदंड पीक यावे अशी इच्छा आहे.” श्रीगुरू म्हणाले, “आता शेतात काय पेरले आहेस ?” शूद्र म्हणाला, “यावनाळ पेरले आहे. तुमच्या दर्शनाने पीक चांगले येईल असे वाटते. काही दिवसांनी कणसे येतील. तुम्ही माझ्या शेतावर कृपादृष्टी टाकावी अशी प्रार्थना आहे.” श्रीगुरू म्हणाले, “माझ्या बोलण्यावर तुझा विश्वास आहे? मी जे सांगीन ते दृढभावाने करशील?” शूद्र म्हणाला “मला गुरुवाक्य प्रमाण आहे. मी आपला शब्द कधीच मोडणार नाही.” श्रीगुरु – “ठीक आहे. आता सांगतो तसे कर. मी संगमावरून परत येईपर्यंत मध्यान्ह होईल. तोपर्यंत उभे असलेले हे सर्व पीक कापून टाक.” शूद्राने ते मान्य केले. श्रीगुरूही अनुष्ठानासाठी संगमावर निघून गेले. शूद्र त्वरेने गावात आला. तेथील अधिकाऱ्याला भेटून म्हणाला, “मला शेत कापण्याची परवानगी असावी. मी शेतसारा म्हणून गतवर्षाप्रमाणेच धान्य देईन.” अधिकारी “अवेळी परवानगी कशी देणार? तुझ्या शेतात वेळेआधीच जास्त पीक आले काय?” शूद्रापाशी वाद घालायला वेळच नव्हता. त्याने ‘गतवर्षीपेक्षा दुप्पट सारा भरीन. जर पीक आले नाही तर साठवणीचे धान्य देईन. त्यानेही पूर्तता झाली नाही तर सरकारने माझी गुरे जप्त करावीत’ असे वचनपत्र लिहून दिले आणि परवानगी मिळविली.

त्यानंतर काही मजुरांना घेऊन तो शेतात गेला आणि त्यांना शेत कापण्यास सांगितले. हे वृत्त कानी पडताच शूद्राची पत्नी आणि मुले धावतच तेथे आली. त्यांनी त्याला अडविण्याचा खूप प्रयत्न केला. पण त्याने कोणालाही जुमानले नाही. एका संन्याशाच्या सांगण्यावरून शेत कापले म्हणून लोकांनी त्याला मूर्ख ठरविले. त्याला प्रतिबंध करण्यासाठीही काहींनी ग्रामाधिकाऱ्यांची भेट घेतली. त्याने शूद्राचे वचनपत्र दाखवून त्यांची बोळवण केली. इकडे शूद्राने शेत कापून टाकले आणि तो श्रीगुरूंची वाट पाहू लागला. मध्यान्ह झाली. श्रीगुरू मठाकडे निघाले. शूद्राने त्यांना कापलेले शेत दाखविले. तेव्हा ते म्हणाले, “धन्य तुझा निर्धार. या श्रद्धेचे तुला फार मोठे फळ मिळेल. आता चिंता करू नकोस.” शूद्र घरी गेला तेव्हा त्याची बायको व मुले अक्षरशः रडत होती. लोक त्यांचे सांत्वन करीत होते. शूद्राने त्यांची समजूत काढली. तो म्हणाला, “जो गुरुवर विश्वास ठेवून त्यांच्या आज्ञेनुसार वागतो त्याच्या बाबतीत हानी संभवतच नाही. आपल्याला सहस्रपटीत लाभ होईल. फक्त विश्वास ठेवा.” त्याने सर्वांना शांत केले.

त्यानंतर आठवड्यातच एकाएकी प्रचंड वादळ आले. अतोनात पर्जन्यवृष्टी झाली. गावकऱ्यांची उभी पिके पार उद्ध्वस्त झाली. ओला दुष्काळ पडला. फार नुकसान झाले. त्या पावसाने शूद्राचे शेत मात्र शतपटीने वाढले. शेतामध्ये सर्वत्र कणसेच दिसू लागली. गुरुकृपेचा तो प्रभाव पाहून शूद्राला अक्षरश: भरून आले. ते दृश्य पाहून त्याची बायको व मुले आनंदाने डोलू लागली. लोकही आश्चर्य करू लागले. शूद्राच्या पत्नीने शेताची पूजा केली. पतीची माफी मागितली. त्यानंतर ती दोघे श्रीगुरूंच्या मठात आली. त्यांची पूजा केली. श्रीगुरुंनी त्यांना विचारले, “शेताचे काय वर्तमान आहे? सर्व कुशल मंगल आहे ना?” तेव्हा दोघांनाही रडू आले. त्यांनी श्रीगुरुंचे पाय धरले व म्हणाले, “स्वामी, तुम्हीच आमचे कुलदैवत. तुम्हीच कामधेनू. तुमची कृपा झाली. भरून पावलो.” श्रीगुरू शूद्राला म्हणाले, “तू माझा निस्सीम भक्त आहेस. तुझ्या घरी लक्ष्मी अखंड वास करील.” महिनाभराने कापणी झाली. गतवर्षापेक्षा शतपट उत्पन्न आले. शूद्राने अधिकाऱ्याला बोलाविले व म्हणाला, “गावात धान्याचा तुटवडा आहे. मी दुप्पट देईन असे म्हणालो होतो पण आता अर्धे उत्पन्न देतो.” ग्रामाधिकारी म्हणाला, “तू मनाने खूप मोठा आहेस. गुरुकृपांकित आहेस. कायद्याने जेवढे द्यायचे तेवढेच दे. बाकीचे घरी घेऊन जा.” पण त्याला राहवले नाही. शेतसारा भरून त्याने स्वतःला आवश्यक तेवढचे धान्य ठेवले आणि बाकीचे ब्राह्मणांना व ग्रामस्थांना वाटून दिले.”

READ  श्री गुरूचरित्र – अध्याय सत्ताविसावा

सिद्ध म्हणाला, “नामधारका, गुरुवचन किती अमोघ असते पाहिलेस! म्हणून त्यांची कधीही अवज्ञा करू नये. गुरूंच्या वचनांचे तंतोतंत पालन करणे, हाच शिष्याचा धर्म. हे आद्य कर्तव्य.”

श्री गुरूचरित्र – अध्याय अठ्ठेचाळीसावा

॥ श्रीगणेशाय नमः ॥

सिद्ध म्हणे नामधारकासी । अपूर्व झालें परियेसीं ।
गुरुचरित्र विस्तारेंसी । सांगतां संतोष होतसे ॥१॥

गाणगापुरीं असतां गुरु । ख्याति झाली अपरंपारु ।
भक्त होता एक शूद्रू । तयाची कथा ऐक पां ॥२॥

श्रीगुरु नित्य संगमासी । जात असता अनुष्‍ठानासी ।
मार्गी तो शूद्र परियेसीं । आपुले शेतीं उभा असे ॥३॥

श्रीगुरुतें नित्य देखोनि । धावत येऊनि शेतांतूनी ।
आपण साष्‍टांगीं नमोनि । पुनरपि जात आपुले स्थाना ॥४॥

माध्यान्हकाळीं मठासी येता । पुनरपि चरणीं ठेवी माथा ।
ऐसे कितीएक दिवस होतां । शूद्राची भक्ति वाढली ॥५॥

श्रीगुरु तयासी न बोलती । नमन केलिया उभे असती ।
येणें विधीं बहु काळ क्रमिती । आला शूद्र नमस्कारा ॥६॥

नमस्कारितां शूद्रासी श्रीगुरु पुसती संतोषीं ।
कां गा नित्य तूं कष्‍टतोसी । नमन करिसी येऊनिया ॥७॥

तुझे मनीं काय वासना । सांग त्वरित आम्हां जाणा ।
शूद्र म्हणे आवड मना । शेत अधिक पिकावें ॥८॥

तयासी पुसती गुरुनाथ । काय पेरिलें शेतांत ।
शूद्र म्हणे यावनाळ बहुत । पीक आलें तुझे धर्मीं ॥९॥

नमस्कारितां तुम्हां नित्य । पीक आलें असे अत्यंत ।
पोटरीं येतील त्वरित । आतां तुझेनि धर्मीं जेवूं ॥१०॥

स्वामी यावें शेतापासीं । पहावें अमृतदृष्‍टींसी ।
तूं समस्तां प्रतिपाळिसी । शूद्र म्हणोनि न उपेक्षावें ॥११॥

श्रीगुरु गेले शेतापासीं । पाहूनि म्हणती त्या शूद्रासी ।
सांगेन एक ऐकसी । विश्वास होईल बोलाचा ॥१२॥

जें सांगेन मी तुजसी । जरी भक्तीनें अंगिकारिसी ।
तरीच सांगूं परियेसीं । एकभावें त्वां करावें ॥१३॥

शूद्र विनवी स्वामियासी । गुरुवाक्य कारण आम्हांसी ।
दुसरा भाव आम्हांसी । नाहीं स्वामी म्हणे तो ॥१४॥

मग निरोपिती श्रीगुरु तयासी । आम्ही जातों संगमासी ।
परतोनि येऊं मध्यान्हासी । तंव कापावें सर्व पीक ॥१५॥

ऐसें सांगोनि शूद्रासी । श्रीगुरु गेले संगमासी ।
शूद्र विचारी मानसीं । गुरुवाक्य आपणा कारण ॥१६॥

READ  श्री गुरूचरित्र – अध्याय अठरावा

शीघ्र आला ग्रामांत । अधिकारियासी विनवीत ।
खंडोनि द्यावें मला शेत । गत संवत्सराप्रमाणें धान्य देईन ॥१७॥

अधिकारी म्हणती तयासी । पीक झालें असे बहुवसीं ।
या कारणें उक्तें मागसी । अंगिकार न करिती ॥१८॥

नाना प्रकारें विनवी त्यांसी । द्विगुण देईन गतसंवत्सरेसी ।
अंगिकारिलें संतोषीं । वचनपत्र लिहून घेती ॥१९॥

आपण अभयपत्र घेऊनि । लोक मिळवोनि तत्क्षणीं ।
गेला शेतांत संतोषोनि । म्हणे कापा तयासी ॥२०॥

कापूं लागतां शेतासी । स्त्री-पुत्र वर्जिती तयासी ।
पाषाण घेऊनि स्त्रियेसी । मारुं आला तो शूद्र ॥२१॥

पुत्रातें मांरी येणेंपरी । पळत आले गांवाभीतरीं ।
आड पडतां राजद्वारीं । पिसें लागलें पतीसी ॥२२॥

पीक असे बहुवसी । कापून टाकितो मूर्खपणेंसी ।
वर्जितां पहा आम्हांसी । पाषाणघाईं मारिलें ॥२३॥

संन्याशाचें माहात्म्य वाचें बोले । पीक सर्व कोमळ कापिलें ।
आमुचें जीवित्व भाणास गेलें । आणिक भक्षितों एक मास आम्ही ॥२४॥

अधिकारी म्हणती तयासी । कापी ना का आपुल्या शेतासी ।
पत्र असे आम्हांपासीं । गतसंवत्सरा द्विगुण धान्य द्यावें ॥२५॥

वर्जावया माणसें पाठविती । शूद्र न ऐके कवणे गतीं ।
शूद्र म्हणे अधिकारी भीतीं । पेवीचे कण आतां देईन ॥२६॥

दूत सांगती अधिकारियासी । आम्हीं सांगितलें शूद्रासी ।
सांगोनि पाठविलें तुम्हांसी । विनोद असे परियेसा ॥२७॥

जरी भितील अधिकारी । तरी देईन आतांचि घरीं ।
गुरें बांधीन तयांचे द्वारीं । पत्र आपण दिलें असे ॥२८॥

दूत सांगती ऐशा रीतीं । पुढें वर्तली काय स्थिति ।
राजा अधिकारी तयाप्रती । काय उत्तर बोलतसे ॥२९॥

अधिकारी म्हणती तयासी । आम्हां चिंता कायसी ।
पेव ठाउकें आहे आम्हांसी । धान्य आहे अपार ॥३०॥

इतुकें होतां शूद्रें देखा । पीक कापिलें मनःपूर्वका ।
उभा असे मार्गीं ऐका । श्रीगुरु आले परतोनि ॥३१॥

नमन करोनि श्रीगुरुसी । शेत दाखविलें कापिलें ऐसी ।
श्रीगुरु म्हणती तयासी । वायां कापिलें म्हणोनि ॥३२॥

विनोदें तुज सांगितलें । तुवां निर्धारें कापलें ।
शूद्र म्हणे तुमचें वाक्य भलें । तेंचि मज कामधेनु ॥३३॥

ऐसें ऐकोनि श्रीगुरु म्हणती । निर्धार असे तुझे चित्तीं ।
होईल अत्यंत फळप्राप्ति । चिंता न करीं मानसीं ॥३४॥

ऐसें सांगोनि श्रीगुरुनाथ । आले आपण ग्रामांत ।
सवें शूद्र असे येत । आपुले घराप्रती गेला ॥३५॥

पुसावया येती समस्त । तयाचे घरीं होतो आकांत ।
स्‍त्री-पुत्र सर्व रुदन करीत । म्हणती आपुला ग्रास गेला ॥३६॥

शूद्र समस्तांतें संबोखी । न करीं चिंता रहा सुखी ।
गुरुसोय नेणती मूर्खी । कामधेनु वाक्य तयांचें ॥३७॥

एकेकाचे सहस्‍त्रगुण । अधिक लाभ तुम्हां जाण ।
स्थिर करा अंतःकरण । हानि नव्हे निर्धार पैं ॥३८॥

गुरुकृपा होय ज्यासी । दैन्य कैचें होय त्यासी ।
निधान जोडलें आम्हांसी । म्हणोनि शूद्र सांगतसे ॥३९॥

नर म्हणूं नये श्रीगुरुसी । शिवस्वरुप जाणा भरंवसीं ।
असे कारण पुढें आम्हांसी । म्हणोनि निरोपिलें असे मज ॥४०॥

नानापरी स्‍त्री-पुत्रांसी । संबोधित असे शूद्र अति हर्षीं ।
इष्‍टजन बंधुवर्गासी । येणेंचि रीतीं सांगतसे ॥४१॥

READ  श्री गुरूचरित्र – अध्याय एकोणीसावा

समस्त राहिले निवांत । ऐसें आठ दिवस क्रमित ।
वायु झाला अति शीत । समस्त पिकें नासलीं ॥४२॥

समस्त ग्रामींची पिकें देखा । शीतें नासलीं सकळिका ।
पर्जन्य पडला अकाळिका । मूळ नक्षत्रीं परियेसा ॥४३॥

ग्राम राहिला पिकावीण । शूद्रशेत वाढलें शतगुणें ।
वाढला यावनाळ सगुण । एकेका अकरा फरगडेंसी ॥४४॥

तैं शूद्र-स्‍त्री संतोषोनि । शेता आली पूजा घेऊनि ।
अवलोकितसे आपुले नयनीं । महानंद करितसे ॥४५॥

पीक झालें अत्यंत । देखोनिया समस्त ।
येऊनि जन समस्त तेथ । महदाश्चर्य करीत देखा ॥४६॥

येऊनि लागे पतिचरणीं । विनवीतसे कर जोडोनि ।
बोले मधुर करुणावचनीं । क्षमा करीं म्हणतसे ॥४७॥

अज्ञानमदें अति वेष्‍टिलें । नेणतां तुम्हांतें निंदिलें ।
गुरु कैचा काय म्हणितलें । क्षमा करणें प्राणनाथ ॥४८॥

ऐसें पतीसी संबोधोनि । शेतींचा देव पूजोनि ।
विचार केला दोघांनीं । गुरुदर्शना जावें आतां ॥४९॥

म्हणोनि सांगे स्त्रियेसी । पूजों आलीं श्रीगुरुसी ।
स्वामी पुसती तयांसी । काय वर्तमान म्हणोनिया ॥५०॥

चरणीं लागलीं तेव्हां दोन्ही । हस्तद्वय जोडोनि ।
स्वामीदर्शन उल्हासोनि । उभीं ठाकलीं संमुख ॥५१॥

दोघेंजणें स्तोत्र करिती । जय जयाजी श्रीगुरुमूर्ती ।
कामधेनु कुळदैवत म्हणती । तूंचि आमुचा गुरुराया ॥५२॥

तुझें अमृतवचन आम्हां । चिंतामणिप्रकार महिमा ।
पूर्ण केलें आमुच्या कामा । शरण आलों तुज आम्ही ॥५३॥

भक्तवत्सल ब्रीदख्याति । ऐसें जगीं तुज वानिती ।
आम्हीं देखिलें दृष्‍टांतीं । म्हणोनि चरणीं लागलीं ॥५४॥

नाना प्रकारें पूजा आरती । शूद्र-स्‍त्री करीतसे भक्तीं ।
श्रीगुरु बोलती अतिप्रीतीं । लक्ष्मी अखंड तुझे घरीं ॥५५॥

निरोप घेऊनि दोघेंजण । गेलीं आपुले आश्रमीं जाण ।
करितां मास काळक्रमण । पीक आलें अपार ॥५६॥

गतसंवत्सराहूनि देखा । शतगुणी झालें धान्य अधिका ।
शूद्र म्हणतसे ऐका । अधिकारियातें बोलावोनि ॥५७॥

शूद्र म्हणे अधिकारियासी । पीक गेलें सर्व गांवासी ।
वोस दिसे कोठारासी । आपण देऊं अर्धा भाग ॥५८॥

गतवर्षा द्विगुण तुम्हांसी । अंगिकारिलें मीं परियेसीं ।
धान्य झालें बहुवसीं । शतगुणें अधिक देखा ॥५९॥

परी देईन अर्ध संतोषीं । संदेह न धरा हो मानसीं ।
अधिकारी म्हणती तयासी । धर्महानि केवी करुं ॥६०॥

गुरुकृपा होतां तुजवरी । पीक झालें बहुतांपरी ।
नेऊनिया आपुले घरीं । राज्य करीं म्हणती तया ॥६१॥

संतोषोनि शूद्र देखा । विप्रासी वांटी धान्य अनेका ।
घेऊनि गेला सकळिका । राजधान्य देऊनि ॥६२॥

सिद्ध म्हणे नामधारकासी । श्रीगुरुचरित्र-महिमा परियेसीं ।
दृढ भक्ति असे ज्यासी । दैन्य कैचें तया घरीं ॥६३॥

सकळाभीष्‍टें त्यासी होती । लक्ष्मी राहे अखंडिती ।
गुरु सेवा हो निश्चिती । म्हणे सरस्वतीगंगाधर ॥६४॥

इति श्रीगुरुचरित्रामृत । गुरुशिष्यसंवाद विख्यात ।
भक्ता शूद्रा वर प्राप्त । अष्‍टचत्वारिंशोऽध्याय हा ॥६५॥

इति श्रीगुरुचरित्रपरमकथाकल्पतरौ श्रीनृसिंहसरस्वत्युपाख्याने सिद्धनामधारकसंवादे शूद्रवरप्रदानं नाम अष्‍टचत्वारिंशो‍ऽध्यायः ॥४८॥

॥ श्रीगुरुदेवदत्त ॥ ॥ ओवीसंख्या ॥६५॥

॥श्रीगुरुदत्तात्रेयार्पितमस्तु॥

(PDF) Download श्री गुरूचरित्र – अध्याय अठ्ठेचाळीसावा
श्री गुरुचरित्र सप्ताह वाचन - अध्याय ४८ | Gurucharitra Adhyay 48। Saptah Vachan
श्री गुरूचरित्र – अध्याय अठ्ठेचाळीसावा

श्री गुरूचरित्र – अध्याय एकोणपन्नासावा वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

टीप: माहिती शोधण्यासाठी आणि लिहिण्यासाठी योग्य ती काळजी घेण्यात आली आहे. तरी तुम्हाला काही त्रुटी आढळल्यास कृपया कंमेंट्सद्वारे किंवा कॉन्टॅक्ट फॉर्म द्वारे आम्हाला कळवा.

Leave a Comment