श्री गुरूचरित्र – अध्याय त्रेचाळीसावा

कथासार

॥ अध्याय त्रेचाळिसावा ॥

॥ अनंतव्रत कथा – कौंडिण्य आख्यान ॥

श्रीगणेशाय नमः ॥ श्रीगुरू नृसिंहसरस्वती सायंदेवाला आणि मठात आलेल्या ब्राह्मणांना व भक्तांना भाद्रपद शुद्ध चतुर्दशीच्या दिवशी करावयाच्या अनंत व्रताची माहिती सांगू लागले. ते म्हणाले, “पांडव वनवासात असताना श्रीकृष्णाने त्यांना राजवैभव प्राप्त व्हावे म्हणून ‘अनंत व्रत’ करावयास सांगितले. तो म्हणाला, “सृष्टीत अनंत रूपांनी व्यक्त झालेला म्हणून शेषशायी नारायणाला ‘अनंत’ म्हणतात. अर्थात हे माझेच व्रत आहे. जो करतो त्याला सर्व अभिष्टे प्राप्त होतात.

कृतयुगात सुमंतू नामक वसिष्ठ गोत्री ब्राह्मण होता. भृगुकन्या दीक्षा ही त्याची पत्नी. या दंपतीस सुशीला नावाची कन्या होती. ती लहान असतानाच दीक्षा मरण पावली. सुमंतूने कर्कशी नावाच्या दुष्ट व कलहप्रिय स्त्रीशी दुसरा विवाह केला. ती सुशीलेला खूप त्रास द्यायची, पतीचाही अपमान करायची. सुशीला उपवर झाली. एके दिवशी कौंडिण्य नावाचा एक तरुण ब्राह्मण सुमंतूच्या घरी आला. त्याने सुशिलेला मागणी घातली. सुमंतूने आपल्या कन्येचा त्याच्याशी विवाह लावून दिला. मग जामाताला दोन महिने आपल्या घरीच ठेवून घेतले. या अवधीत आपल्या पत्नीला तिची सावत्र आई किती त्रास देते हे त्याने प्रत्यक्ष अनुभवले. त्याने आपल्या सासन्याला अन्यत्र बिऱ्हाड करण्याचा विचार सांगितला. त्याच्या संमतीने तो भाद्रपद शुद्ध चतुर्दशीस अन्य ग्रामी जाण्यास निघाला. कर्कशी त्यांना निरोप द्यायलाही बाहेर आली नाही. सुमंतूचा नाइलाज झाला. त्याने स्वयंपाकघरातून गव्हाचा थोडासा कोंडा वस्त्रात बांधून कन्येच्या हाती दिला. सुशीलेने पित्याचा निरोप घेतला आणि रथात बसून निघाली. कौंडिण्याने नदीतीरी रथ थांबविला आणि तो अनुष्ठानास बसला. तिथे लाल वस्त्रे परिधान केलेल्या काही स्त्रिया आल्या होत्या. त्या पूजेमध्ये निमग्न झाल्या होत्या. सुशीलाने जिज्ञासेने विचारणा केली असता त्या स्त्रिया म्हणाल्या, “आम्ही सकल अभीष्ट करणारे ‘अनंतव्रत’ करीत आहोत.” त्यांनी तिला व्रताचा सर्व विधी समजावून सांगितला. तिला व्रताचे साहित्य दिले. मग तिनेही अनंताची पूजा केली. पित्याने दिलेल्या गव्हाच्या कोंड्याचा अर्धा भाग वाण म्हणून दिला. त्या सर्व स्त्रियांचा निरोप घेऊन ती पतीपाशी आली. त्याचेही अनुष्ठान पूर्ण झाले होते, ती दोघे एका वैभवशाली नगरापाशी आले. तेथील लोकांनी कौंडिण्याचे स्वागत केले आणि ‘हे तपोनिधी, आजपासून तुम्हीच या नगराचे अधिपती’ असे म्हणून त्या दोघांना वाजतगाजत प्रासादात नेले. अशा प्रकारे अनंत व्रताच्या पुण्याईने त्यांचा भाग्योदय झाला. काही दिवसांनी कौंडिण्याने सुशीलेला विचारले, “तुझ्या हातात हा लाल दोरा कसला?” तिने सर्व हकिकत सांगितली व म्हणाली, “अनंतव्रत केल्यामुळेच आपल्याला राजलक्ष्मी प्राप्त झाली आहे.” ते ऐकून कौंडिण्याला राग आला. तो म्हणाला, “कोण अनंत? कसला दोरा? हा सर्व माझ्या तपश्चर्येचा पुण्यलाभ आहे.” त्याने तिच्या हातातील दोरा तोडला आणि आगीत भिरकावला. सुशीलेने धावत जाऊन तो दोरा काढला आणि दुधात भिजवला. या प्रमादामुळे भगवान अनंत संतापले. त्यांची अवकृपा होताच कौंडिण्याच्या नगरावर शत्रूंनी आक्रमण करून तेथील सर्व संपत्ती लुटली. शत्रू प्राणघात करील या भीतीने कौंडिण्य पत्नीसह अरण्यात पळून गेला. त्याला पश्चात्ताप वाटत होता. ‘अनंत मला क्षमा कर’ असा आक्रोश करीत तो मार्गक्रमण करू लागला. मार्गामध्ये त्याला फळांनी बहरलेला आम्रवृक्ष दिसला. तिथे पक्षी फिरकत नव्हते. सवत्स धेनू दिसली. तिला चारा खाता येत नव्हता. मग दयनीय अवस्थेतील एक बैल दिसला. आणखी पुढे पाण्याने भरलेली व एकमेकात मिसळलेली दोन रम्य सरोवरे दिसली. पण हंसादी एकही पक्षी तेथे फिरकत नव्हता. पुढे एक गर्दभ व हत्ती दिसला. कौंडिण्याने त्यांच्यापाशी अनंताची चौकशी केली. त्यांच्यापैकी कोणीच काही बोलले नाही.

कौंडिण्य आपल्या भेटीसाठी तळमळतो आहे हे पाहून भगवान अनंत वृद्ध ब्राह्मणाच्या रूपात त्याच्यापाशी गेले. ‘मी तुला अनंताचे दर्शन घडवितो!’ असे सांगून त्याला त्याच्याच नगरात परत आणले. ते पूर्वीपेक्षा अधिक वैभवसंपन्न पाहून कौंडिण्यास मोठे आश्चर्य वाटले. ब्राह्मणाने त्याला प्रासादात नेऊन सिंहासनावर बसविले. मग ब्राह्मणवेष टाकून त्याला शंख, चक्र, गदा व पद्मधारी असे चतुर्भुज रूप दाखविले. कौंडिण्याने त्याला मनोभावे वंदन केले आणि मार्गात पाहिलेल्या आम्रवृक्षादिकांबद्दल विचारले.

अनंत म्हणाले, “आम्रवृक्ष पूर्वजन्मी विद्वान ब्राह्मण होता त्याने आपल्या शिष्यांना कधीही ज्ञान दिले नाही. गायीने पूर्वी मनुष्य जन्मात ब्राह्मणाला पडीक जमीन दान दिली होती. बैल पूर्वी श्रीमंत ब्राह्मण होता. त्याने कधीच दानधर्म केला नाही. सरोवरे ही पूर्वजन्माची सख्खी भावंडे. त्या बहिणींनी एकमेकींनाच काय द्यायचे ते दिले, दुसऱ्यांना कधीच काही दिले नाही. तू पाहिलेला गर्दभ हा तुझा क्रोधच होय तो तुझ्या जाणिवेतून बाहेर पडून गर्दभाच्या जन्माला गेला. हत्ती हा तुझ्या तपश्चर्येचा गर्व होय तो तुझ्या जाणिवेतून बाहेर पडून हत्तीरूपाने जन्मला. आता पश्चात्तापाने तुझे व त्या सर्वांचे चित्त शुद्ध झाले आहे म्हणून मी त्यांना त्याच्या स्थितीतून मुक्त केले आहे. तू पुनर्वसू नक्षत्रमंडलात चिरकाल वास करशील.”

श्रीगुरू म्हणाले, “अनंतव्रत केल्याने कौंडिण्याचे कल्याण झाले, पांडवांना राज्यप्राप्ती झाली. तेव्हा तुम्हीही व्रताचरण करून पुण्यप्राप्ती साधा.” श्रीगुरुच्या आज्ञेने सायंदेवाने त्या दिनी अनंतव्रत केले.

READ  श्री गुरूचरित्र – अध्याय पस्तीसावा

सिद्ध म्हणाला, “नामधारका, तुझा पूर्वज सायंदेव याने श्रीगुरूंची सेवा करून त्यांची कृपा संपादन केली.”

श्री गुरूचरित्र – अध्याय त्रेचाळीसावा

॥ श्रीगणेशाय नमः ॥ श्रीसरस्वत्यै नमः ॥ श्रीगुरुभ्यो नमः ॥

नामधारक म्हणे सिद्धासी । पुढें चरित्र जाहलें कैसी ।
विस्तारावें आम्हांसी । कृपा करीं गा दातारा ॥१॥

सिद्ध म्हणे ऐक वत्सा । समस्त भक्त सेवा करितां ।
त्यांत एक विणकर तंतिक अत्यंता । करीतसे भक्ति श्रीगुरुची ॥२॥

तीन प्रहर संसारयात्रा । करुनि येतसे पवित्रा ।
राजांगण झाडी विचित्रा । नमस्कार करी दुरोनि ॥३॥

ऐसे किती दिवस क्रमिले । व्रत शिवरात्री आलें ।
समस्त यात्रेसी निघाले । मातापिता तंतिकाचे ॥४॥

त्यासी बोलाविती यात्रेसी । तो म्हणतसे नयें तयांसी ।
तुम्ही मूर्ख असा पिसीं । माझा श्रीपर्वत येथेंचि असे ॥५॥

श्रीगुरु माझा मल्लिकार्जुन । पर्वत म्हणिजे श्रीगुरुभुवन ।
आपण न यें येथून । चरण सोडोनि श्रीगुरुचे ॥६॥

समस्त लोक त्यासी हांसती । पिसें लागलें यासी म्हणती ।
चला जाऊं म्हणोनि निघती । भ्राता माता पिता त्याचे ॥७॥

नगरलोक समस्त गेला । आपण एकला राहिला ।
श्रीगुरुमठासी आला । गुरु पुसती तयासी ॥८॥

श्रीगुरु म्हणती तयासी । कां गा यात्रेसी तूं न वचसी ।
तंतिक म्हणे स्वामीसी । माझी यात्रा तुमचे चरण ॥९॥

नाना तीर्थयात्रादि देखा । तुमचे चरणीं असे निका ।
वायां जाती मूर्ख लोक । पाषाणदर्शन करावया ॥१०॥

ऐसें म्हणोनि तंतिक । नमस्कार करी नित्य देख ।
तंव पातली शिवरात्रि ऐक । माघवद्य चतुर्दशी ॥११॥

श्रीगुरु होते संगमासी । दोन प्रहर होतां भक्त परियेसीं ।
आपण गेला स्नानासी । उपवास असे शिवरात्रीचा ॥१२॥

संगमीं स्नान करोनि । श्रीगुरुतें नमस्कारोनि ।
उभा ठेला कर जोडोनि । भक्तिपूर्वक एकोभावें ॥१३॥

श्रीगुरु म्हणती तयासी । तुझीं समस्त गेलीं यात्रेसी ।
तूं एकलाचि राहिलासी । पहातासी विनोद श्रीपर्वताचा ॥१४॥

पुसती कधीं देखिलासी? । म्हणे स्वामी नेणें कधींसी ।
तुमचे चरणीं आम्हांसी । सर्व यात्रा सदा असती ॥१५॥

त्याचा भाव पाहोनी । जवळी बोलाविती श्रीगुरुमुनि ।
बैस म्हणती कृपा करुनि । दाखवूं म्हणती श्रीपर्वत ॥१६॥

नयन झांकूनि पादुकेसी । दृढ धरीं गा वेगेंसीं ।
ऐसें म्हणोनि तयासी । मनोवेगें घेऊनि गेले ॥१७॥

क्षण न लागतां श्रीगिरीसी । घेऊनि गेले भक्तासी ।
तीरीं बैसले पाताळगंगेसी । नयन उघडीं म्हणती त्यातें ॥१८॥

क्षणैक मात्र निद्रावस्था । म्हणतां झाला जागृता ।
अवलोकितां पर्वत दिसत । म्हणे स्वप्न किंवा सत्य ॥१९॥

श्रीगुरु म्हणती तयासी । कां गा भ्रांतपणें पाहसी ।
वेगें जावें दर्शनासी । क्षौर स्नान करुनियां ॥२०॥

श्रीगुरु ऐसे निरोप देतां । शीघ्र गेला स्नानाकरितां ।
तेथें देखिलीं मातापिता । भ्राता ग्रामलोक सकळिक ॥२१॥

ते पुसती तयासी । कवणें मार्गें आलासी ।
आमुची भेटी कां न घेसी । लपून येणें कोण धर्म ॥२२॥

विनवीतसे मातापित्यांसी । आम्ही निघालों आजि दोन प्रहरेंसी ।
एक घटिका लागली वाटेसी । आतां आलों गुरुसमागमें ॥२३॥

एक हांसती मिथ्या म्हणती । आम्हांसवेंचि आला लपत ।
ऐसें बडिवारें बोलत । अबद्ध म्हणती सकळ जन ॥२४॥

तो कोणासवें न बोले । शीघ्र स्नान क्षौर केलें ।
पुष्पें अक्षता बेलें । घेऊनि गेला पूजेसी ॥२५॥

पूजा करितां लिंगस्थानीं । देखता झाला श्रीगुरुमुनि ।
अति विस्मय करोनि । पूजा केली मनोभावें ॥२६॥

समस्त लोक पूजा करिती । श्रीगुरु सर्व पूजा घेती ।
तंतिक म्हणतसे चित्तीं । श्रीगुरुराज आपणचि शंकर ॥२७॥

ऐसा निर्धार करुनि । पाहिजे प्रसाद-फल खुणी ।
घेऊनि आला गुरुसंनिधानीं । एकचित्तें परियेसा ॥२८॥

श्रीगुरु पुसती तयासी । एधवां राहसी किंवा जासी ।
तंतिक विनवी स्वामियासी । एक देखिलें नवल आतां ॥२९॥

समस्त लोक जाऊनि । देवालयाभीतरीं बैसोनि ।
पूजा करिती तुमचे चरणीं । लिंग न देखों तुम्हीच तेथें ॥३०॥

श्रीगुरु तूं जवळीच असतां । इतुके दुरी कां कष्‍टती वृथा ।
लोक येताति बहुता । काय कारण या स्थाना ॥३१॥

तूं तरी केवळ परमेश्वर । दिसतोसि आम्हां नर ।
न कळे तुझा महिमा अपार । गौप्यरुपें गुरुनाथा ॥३२॥

सर्व जन मूढ होऊन । नेणती तुझें महिमान ।
कां हो येताति या स्थानीं । विस्तारोनि सांग मज ॥३३॥

श्रीगुरु म्हणती ऐक भक्ता । सर्वत्र ईश्वरपूर्णता ।
स्थानमहिमा असे ख्याता । जे अगम्य त्रिभुवनीं ॥३४॥

तंतिक म्हणे स्वामियासी । तूं तरी पूर्ण ब्रह्म होसी ।
स्थानमहिमा वानिसी । विस्तारुनि सांग आम्हां ॥३५॥

READ  श्री गुरूचरित्र – अध्याय सत्तेचाळीसावा

श्रीगुरु निरोपिती भक्तासी । येथील महिमा पुससी ।
सांगेन ऐक विस्तारेंसीं । स्कंदपुराणीं असे कथा ॥३६॥

माघवद्य चतुर्दशी । अपार महिमा श्रीपर्वतासी ।
सांगेन ऐक तत्परेसीं । श्रीगुरु म्हणती तंतिकातें ॥३७॥

पूर्वी ख्यात किरातदेशीं । ‘विमर्षण’ राजा परियेसीं ।
शूर असे पराक्रमेंसीं । समस्त शत्रु जिंकिले तेणें ॥३८॥

आणिक एक कुबुद्धि असे । पारधी करी बहुवसें ।
बलाढय स्थूळ बहु असे । चंचळ सकळ-स्त्रियारत ॥३९॥

सर्वमांस भक्षण करी । ग्राह्य अग्राह्य न विचारी ।
ऐसा वर्ते दुराचारी । ईश्वर पूजी भक्तिभावें ॥४०॥

नित्य पूजा करी अपार । शिवरात्रि आलिया हर्षनिर्भर ।
गीत नृत्य वाद्य परिकर । भक्तिपूर्वक करी पूजा ॥४१॥

आचार तरी बरवा नसे । शिवपूजा करी बहुवसें ।
पत्‍नी त्यासी एक असे । सुलक्षण नाम ‘कुमुद्वती’ ॥४२॥

सुशील सुगुण पतिव्रता । मनीं करी बहुत चिंता ।
पुरुष आपुला परद्वाररता । ईश्वरभक्ति करीतसे ॥४३॥

ऐसें क्रमितां एके दिवसीं । पुसों लागली आपुले पुरुषासी ।
म्हणे प्राणेश्वरा परियेसीं । विनंति एक असे माझी ॥४४॥

क्षमा करावी माझिया बोला । विस्तारोनि सांगावें सकळा ।
तुम्ही दुराचारी भक्षितां सकळां । परद्वार निरंतर ॥४५॥

तुम्हांला ईश्वरावरी । भक्ति उपजली कवणेपरी ।
सांगावें स्वामी सविस्तारीं । कोप न करावा प्राणनाथा ॥४६॥

राजा म्हणे स्त्रियेसी । बरवें पुसिलें आम्हांसी ।
ज्ञान झालें आतां मानसीं । पूर्व जन्म सांगेन माझा ॥४७॥

पूर्वीं पंपानगरीं आपण । श्वानयोनीं जन्मोन जाण ।
होतों तेथें काळ क्रमोन । शिवरात्रि आली एके दिवसीं ॥४८॥

त्या नगरीं होतें एक शिवालय । समस्त लोक आले पूजावया ।
आपणही गेलों हिंडावया । भक्षावया कांहीं मिळेल म्हणोनि ॥४९॥

उत्साहें लोक पूजा करिती । नाना वाजंतरें वाजतीं ।
गर्भगृहीं प्रदक्षिणा करिती । धरुनि आरति सकळिक ॥५०॥

आपण गेलों द्वारांत । विनोदें पाहूं म्हणत ।
मज देखोनि आले धांवत । काष्‍ठ पाषाण घेवोनियां ॥५१॥

आपण पौळीमध्यें होतों पळत । द्वार घातलें मारूं म्हणत ।
धरा धरा मारा म्हणोनि बोलत । मारुं लागले पाषाणीं ॥५२॥

वाट नाहीं बाहेर जावयासी । अभिलाष असे जीवासी ।
पळतसें देवालयभीतरेसी । मार्ग नाहीं कोठें देखा ॥५३॥

बाहेर जाईन म्हणत । द्वाराकडे मागुती येत ।
सवेंचि लोक पाठीं लागत । सव्य प्रदक्षिणा पळतसें ॥५४॥

लपावया ठाव नाहीं देखा । वेष्‍टिलों पौळीं दुर्गासरिखा ।
पाठी लागले सकळिका । पुन्हा पौळींत पळे तैसाचि ॥५५॥

उच्छिष्‍ट कांहीं मिळेल म्हणोनि । देउळांत गेलों भामिनी ।
काकुळती बहु मनीं । प्राण वांचेल म्हणोनियां ॥५६॥

ऐसा तीन वेळां पळालों । मारतील म्हणोनि बहु भ्यालों ।
मग अंतरगृहीं निघालों । पूजा देखिली तेथ शिवाची ॥५७॥

द्वार धरोनि समस्त लोक । शस्त्रें मारिलें मज ऐक ।
ओढोनि टाकिती सकळिक । शिवालयाबाहेरी ॥५८॥

मज पुण्य घडलें प्रदक्षिणीं । पूजा देखिली नयनीं ।
तेणें पुण्यें राजा होउनि । उपजलों ऐक प्राणेश्वरी ॥५९॥

शिवरात्रि होती ते दिवसीं । न मिळे उच्छिष्‍ट भुक्तीसी ।
प्राण त्यजिला उपवासी । तेंही पुण्य मज घडलें ॥६०॥

आणिक एक पुण्य घडलें । दीपमाळीस दीपक उजळले ।
ते म्यां डोळां देखिले । प्राण त्यजिला शिवद्वारीं ॥६१॥

तेणें पुण्यें झालें ज्ञान । ऐक शिवरात्रीचें महिमान ।;
म्हणसी तूं दुराचारी म्हणोनि । त्याचा संदेह सांगेन ॥६२॥

पूर्वजन्म माझा श्वान । त्याचा स्वभाव सर्वभक्षण ।
सर्वां ठायीं त्याची वासना । तेचि स्वभाव मज असती ॥६३॥

ऐसें स्त्रियेसी सांगितलें । पुन्हा प्रश्न तिणें केले ।
म्हणे स्वामी जें सांगितलें । आपुला जन्म पुरातन ॥६४॥

तुम्ही असा सर्वज्ञानी । माझा जन्म सांगा विस्तारुनि ।
म्हणोनि लागतसे चरणीं । कृपा करीं गा प्राणेश्वरा ॥६५॥

ऐक वपुषे ज्ञान सती । तुझा पूर्व जन्म कपोती ।
करीत होतीस उदरपूर्ती । एके दिवसीं अवधारीं ॥६६॥

पडिला होता मांसगोळा । तो तुवां चोंचीनें धरिला कवळा ।
उडत होतीस आकाशमंडळा । तें दुरुनि देखिलें घारीनें ॥६७॥

कवळ घेईन म्हणोनि । घार आली धांवोनि ।
तूं गेलीस वो पळोनि । महारण्य क्रमीत ऐका ॥६८॥

पाठीं लागली ते घारी । मागें पुढें न विचारी ।
तूं पळालीस ते अवसरीं । श्रीपर्वत-गिरीवरी ॥६९॥

सवेंचि आली ते घारी । तूं गेलीस शिवालय-शिखरीं ।
भोंवों लागलीस प्रदक्षिणापरी । श्रम जाहले तुज बहुत ॥७०॥

दुरोनि आलीस धांवत । प्राण होता कंठगत ।
श्रमोनि शिखरीं तूं बैसत । घारीं येऊनि मारिलें चोंचीं ॥७१॥

घेऊनि गेली मांस-कवळें । तुझें देह पंचत्व पावलें ।
प्रदक्षिणा-पुण्य फळलें । झालीस तुवां राजपत्‍नी ॥७२॥

READ  श्री गुरूचरित्र – अध्याय बत्तिसावा

इतुकिया अवसरीं । पुनः पतीस प्रश्न करी ।
आतां तुमच्या निरोपावरी । ईश्वरपूजा करीन ॥७३॥

पुढें मज काय होईल । तुम्हीं कवण स्थानीं असाल ।
तें विस्तारावें प्राणेश्वरा निर्मळ । आत्मपति राजेंद्रा ॥७४॥

राजा सांगे सतीसी । पुढील जन्म कन पुससी ।
आपण राजा सिंधुदेशीं । जन्म पावेन अवधारीं ॥७५॥

माझी भार्या तूंचि होसी । जन्म पावसी सृंजयदेशीं ।
तेथील राजा पवित्रवंशी । त्याची कन्या होसील ॥७६॥

तिसरा जन्म आपणासी । राजा होईन सौराष्‍ट्रदेशीं ।
तूं उपजसी कलिंगराजवंशीं । माझी पत्‍नी होसील ॥७७॥

चवथा जन्म आपणासी । राजा होईन गांधारदेशीं ।
तूं उपजसी मागध कुळेसी । तैंही माझी प्राणेश्वरी ॥७८॥

पांचवा जन्म आपणासी । राजा होईल अवंतदेशीं ।
तूं दाशार्हराजकुळीं जन्मसी । माझी भार्या होसील तूं ॥७९॥

सहावा जन्म आपणासी । आनर्त नाम राजा परियेसीं ।
यायातिकन्या तूं होसी । तैंही माझी प्राणेश्वरी ॥८०॥

सातवा जन्म आपणासी । राजा होईन पांडयदेशीं ।
रुप लावण्य मजसरसीं । नोहे कवण संसारीं ॥८१॥

ज्ञानी सर्वगुणी होईन । सूर्यकांति ऐसें वदन ।
जैसा रुपें असे मदन । नाम माझें ‘पद्मवर्ण’ ॥८२॥

तूं जन्मसी वैदर्भकुळीं । रुपसौंदर्यें आगळी ।
जैसी सुवर्णाची पुतळी । चंद्रासारिखें मुखकमळ ॥८३॥

‘वसुमती’ असें नांव पावसी । तुज वरीन स्वयंवरेंसीं ।
दमयंती नळा जैसी । स्वयंवर होईल तुज मज ॥८४॥

राज्य करीन बहुत दिवस । यज्ञ करीन असमसाहस ।
जिंकीन समस्त देशांस । मंत्रशास्त्र शिकेन बहु ॥८५॥

देवद्विजार्चन करीन । नाना अग्रहार दान देईन ।
ऐशापरी वृद्धाप्य होऊन । राज्यीं स्थापीन पुत्रासी ॥८६॥

आपण चवथा आश्रम घेईन । अगस्त्यऋषीपाशीं जाईन ।
ब्रह्मज्ञानोपदेश शिकेन । अंतकाळ होय तंव ॥८७॥

देहावसान होतां । तुज घेईन सांगाता ।
दिव्य विमानीं बैसोनि तत्त्वता । स्वर्गाप्रती जाऊं बळें ॥८८॥

ईश्वरपूजेची महिमा । शिवरात्रिव्रत श्रीशैल्य अनुपम्या ।
म्हणोनि राजा स्त्री घेऊनि संगमा । यात्रा करी शिवरात्री ॥८९॥

श्रीगुरु म्हणती तंतिकासी । शिवरात्री-श्रीपर्वत-महिमा ऐसी ।
ऐक तो श्वान परियेसीं । सप्तजन्मीं राजा झाला ॥९०॥

अंतीं पावला स्वर्गलोक । पर्वतमहिमा ऐसा ऐक ।
तुज जाहलें गुरुमुख । ईश्वरपूजा करीं बरवी ॥९१॥

ग्रामीं असे कल्लेश्वर । गाणगाग्रामीं भीमातीर ।
पूजा करीं गा निरंतर । मल्लिकार्जुनसमान ॥९२॥

संगमेश्वर संगमासी । पूजा करीं अहर्निशीं ।
मल्लिकार्जुन तोचि परियेसीं । न धरीं संदेह मनांत ॥९३॥

तंतिक म्हणे स्वामियासी । स्वामी तूं मज चाळविसी ।
पूजेसि गेलों मल्लिकार्जुनासी । लिंगस्थानीं तुज देखिलें ॥९४॥

सर्वां ठायीं तूंचि एक । झाला अससी व्यापक ।
कल्लेश्वर संगमनायक । एकेक सांगसी आम्हांपुढें ॥९५॥

ऐकोनि श्रीगुरु हांसती । ये रे पादुका धरीं म्हणती ।
नयन त्याचे झांकिती । संगमा आले तात्काळीं ॥९६॥

इतुकिया अवसरीं । मागें गाणगापुरीं ।
श्रीगुरुसी पाहती गंगातीरीं । कोठें गेले म्हणोनियां ॥९७॥

एक म्हणती संगमीं होता । एक म्हणती आम्हीं आलों आतां ।
कोठें गेले पहा म्हणतां । चुकर होती भक्तजन ॥९८॥

श्रीगुरु आले संगमासी । तंतिकास पाठविती मठासी ।
बोलावावया शिष्यांसी । आपण राहिले संगमांत ॥९९॥

तंतिक आला गांवांत । लोक समस्त हांसत ।
क्षौर कां रे केलें म्हणत । तंतिक म्हणे श्रीपर्वता गेलों होतों ॥१००॥

दवणा प्रसाद विभूति । नानापरींचे हार दाखविती ।
लोक ऐसा विस्मय करिती । म्हणती दोनप्रहरीं घरीं होता ॥१॥

एक म्हणती सत्य मिथ्या । त्यासी म्हणती सांग रे सत्या ।
तंतिक म्हणे सवें गुरुनाथा । गेलों होतों वायुवेगें ॥२॥

श्रीगुरु आले संगमासी । मज पाठविलें मठासी ।
बोलाविलें शिष्यांसी । राहूं पाहती आजि संगमीं ॥३॥

एक म्हणती होईल सत्य । मूर्ख म्हणती नव्हे, मिथ्य ।
तंतिक गेला त्वरित । शिष्यवर्गांसी जाणविलें ॥४॥

सांगितला सकळ वृत्तांत । समस्त गेले संगमा त्वरित ।
पूजा जाहली संगमीं बहुत । सिद्ध म्हणे नामधारकासी ॥५॥

मिथ्या म्हणती जे लोक । त्यांसी होईल कुंभीपाक ।
पंधरा दिवसीं ऐक । यात्रालोक गांवा आले ॥६॥

मग पुसती तयांसी । तेहीं सांगितलें भरंवसीं ।
आनंद झाला भक्तांसी । म्हणे सरस्वती-गंगाधर ॥७॥

सिद्धें सांगितलें नामधारकासी । तें मी सांगतसें परियेसीं ।
श्रीगुरुमहिमा अपारेंसी । अमृत सेवितों निरंतर ॥१०८॥

इति श्रीगुरुचरित्रामृते परमकथाकल्पतरौ श्रीनृसिंहसरस्वत्युपाख्याने सिद्धनामधारकसंवादे श्रीशैलशिवरात्रिमहिमावर्णनं नाम त्रिचत्वारिंशोऽध्यायः ॥४३॥

॥ श्रीगुरुदेवदत्त ॥         ॥ ओंवीसंख्या १०८ ॥

॥श्रीगुरुदत्तात्रेयार्पणमस्तु॥

(PDF) Download श्री गुरूचरित्र – अध्याय त्रेचाळीसावा
श्री गुरुचरित्र सप्ताह वाचन - अध्याय ४३ | Gurucharitra Adhyay 43 । Saptah Vachan
श्री गुरूचरित्र – अध्याय त्रेचाळीसावा

श्री गुरूचरित्र – अध्याय चव्वेचाळीसावा वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

टीप: माहिती शोधण्यासाठी आणि लिहिण्यासाठी योग्य ती काळजी घेण्यात आली आहे. तरी तुम्हाला काही त्रुटी आढळल्यास कृपया कंमेंट्सद्वारे किंवा कॉन्टॅक्ट फॉर्म द्वारे आम्हाला कळवा.

Leave a Comment