श्री गुरूचरित्र – अध्याय चव्वेचाळीसावा

कथासार

॥ अध्याय चव्वेचाळीसावा ॥

॥ विणकराला मल्लिकार्जुन दर्शन, विमर्षण राजाची कथा ॥

श्रीगणेशाय नमः ॥ सिद्ध नामधारकाला म्हणाला, “गाणगापुरातील एक विणकर (कोष्टी) दिवसातून तीन वेळा श्रीगुरुंचे दर्शन घ्यायचा, मठांगण झाडायचा आणि आपल्या कामाला जायचा. एकदा महाशिवरात्रीच्या निमित्ताने गाणगापुरातील बरीचशी मंडळी मल्लिकार्जुनाच्या दर्शनासाठी श्रीशैल यात्रेस निघाली. त्यांत विणकराचे माता, पिता, बंधू आणि आप्तही होते. त्यांनी त्याला बरोबर चलण्याचा खूप आग्रह केला. तेव्हा ‘गुरुदेव हेच माझे मल्लिकार्जुन! गुरुभुवन हेच श्रीशैल! गुरुसेवा हीच तीर्थयात्रा!’ असे सांगून त्याने त्यांच्या बरोबर जाण्यास नकार दिला. लोकांना ते रुचले नाही. ते यात्रेस निघून गेले. महाशिवरात्रीच्या दिवशी दुसऱ्या  प्रहरी श्रीगुरू संगमावर गेले होते. विणकराचा उपवास होता. त्याने संगमावर स्नान करून श्रीगुरुंचे दर्शन घेतले. ते म्हणाले, “तू यात्रेला का गेला नाहीस? श्रीशैल पर्वत फार मनोहर आहे.” विणकर म्हणाला, “स्वामी, तुमच्या चरणी सर्व तीर्थे आहेत. त्यांच्या दर्शनाचेच मला श्रीशैल यात्रेचे पुण्य मिळते.” ते ऐकून श्रीगुरुंना परम संतोष वाटला. ते त्याला म्हणाले, “तू माझ्या पादुका दृढ धरून बैस, डोळे मिटून घे. मी तुला शैल पर्वताचे दर्शन घडवितो.” त्याने तसे करताच श्रीगुरूंनी त्याला मनोवेगाने पर्वतावर नेले. त्याने डोळे उघडले तेव्हा आपण शैल पर्वतावर पाताळगंगेच्या काठी श्रीगुरूंच्या सानिध्यात बसलो आहोत हे पाहून त्याला मोठे नवल वाटले.

श्रीगुरूंच्या आज्ञेने तो स्नानासाठी गेला. तेथे त्याचे माता पिता व अन्य ग्रामस्थ भेटले. ते त्याला म्हणाले, “तुला यायचेच होते तर आधी ‘नाही’ का म्हणालास?” तो म्हणाला, “मी श्रीगुरूंच्या समवेत आजच्या दुसऱ्या प्रहरास निघालो आहे. मला येथे येऊन घटकाही झाली नाही.” पण कोणीही त्याच्यावर विश्वास ठेवला नाही. तो दर्शनासाठी गाभाऱ्यात गेला. तेथे मल्लिकार्जुन लिंगस्थानी स्वतः श्रीगुरु बसले असून लोकांची सेवा स्वीकारीत आहेत असे दृश्य दिसते. तेव्हा त्याला खूपच आश्चर्य वाटले. पूजन करून तो श्रीगुरुंपाशी आला. त्यांना सर्व वृतान्त सांगितला व म्हणाला, “गुरुदेव, तुम्ही स्वतःच शंकर आहात, पण लोकांना ते कसे कळत नाही? ते यात्रेसाठी दूर का येतात?” श्रीगुरू विणकराला म्हणाले, “स्थानांचे माहात्म्य विशेष असते. तिथींचेही महत्त्व आहेच. आज माघ वद्य चतुर्दशी ही तिथी ‘महाशिवरात्र’ म्हणून प्रख्यात आहे. या पुण्यपर्वणी दिनी शिवाप्रीत्यर्थ भजन, पूजन, उपोषण, जागरण करणे; शिवक्षेत्राची यात्रा करणे महाफलदायी असते. या संदर्भातील एक कथा सांगतो, ऐक.

किरात देशाचा विमर्षण राजा परम शिवभक्त असूनही हिंसा, दुराचार, मांसाहार व परस्त्रीसंग करायचा. त्याची राणी कुमुदती हिला पतीच्या परस्परविरुद्ध स्वभावाचे नेहमी नवल वाटायचे. एकदा तिने राजाला प्रत्यक्षच विचारले – “तुम्ही शिवभक्त असूनही निषिद्ध गोष्टी कशा करता?” विमर्षण म्हणाला, “पूर्वजन्मी मी पंपानगरीत श्वान म्हणून जन्मलो होतो. काहीतरी खायला मिळेल या आशेने मी एका महाशिवरात्रीस शिवमंदिरापाशी घुटमळत होतो. लोक मला मारायला धावले. मी प्राणभयाने मंदिराभोवती तीन प्रदक्षिणा घातल्या. मग मंदिरात प्रवेशलो. तेथे शिवपूजा पाहिली तेवढ्यात कोणीतरी वर्मावर मारले. मी गतप्राण झालो. महाशिवरात्रीस मला उपोषण, प्रदक्षिणा, देवदर्शन घडले, शिवासन्मुख मरण आले. त्या पुण्याईने मला राजाचा जन्म व हे वैभव मिळाले. म्हणूनच मला शिवभक्ती प्रिय आहे. असे असूनही पूर्वीचे श्वानजन्मातील संस्कार अजूनही तसेच असल्याने माझी वासना अनिर्बंध आहे.”

ते ऐकून राणीला नवल वाटले. तिने स्वतःच्या पूर्वजन्माविषयी विचारले. राजा म्हणाला, “प्रिये, तू पूर्वजन्मी कपोती होतीस. एकदा चोचीत मांसाचा तुकडा धरून तू आकाशात उडत होतीस. तो मांसाचा तुकडा मिळविण्यासाठी एक घार तुझ्या पाठीशी लागली. तू जीवाच्या आकांताने श्रीशैल पर्वतावर गेलीस. मल्लिकार्जुनाच्या कळसाभोवती घिरट्या घालून शिखरावर बसलीस. घारीने तुला मारले आणि मांसाचा तुकडा घेऊन गेली. तुझा निष्प्राण देह मंदिराच्या प्रांगणात पडला. कळसाला प्रदक्षिणा आणि देवदारी निधन यामुळे पुण्यवृद्धी होऊन तुला राणीचा जन्म मिळाला. यानंतरचे पुढील सात जन्म मी राजाच होणार आहे. त्या प्रत्येक वेळी तूच माझी धर्मपत्नी असणार आहे. त्यानंतर आपण दोघे दिव्य विमानातून गाणगापुरात येऊ. संगमावर कल्लेश्वराचे मंदिर आहे. तो मलिकार्जुन आहे या भावनेने तू त्याची नित्य पूजा कर.” त्यानंतर श्रीगुरु मनोवेगाने संगमावर आले. त्यांनी विणकराला मठात पाठविले. महाशिवरात्रीच्या दिवशी श्रीगुरू कोठे गेले म्हणून ग्रामस्थ व शिष्य त्यांचा शोध घेत असतानाच विणकराचे आगमन झाले. त्याने मल्लिकार्जुन यात्रेचा सर्व वृत्तान्त सांगितला. लोकांना प्रसाद म्हणून आणलेला दवणा व अंगारा दाखविला. लोकांनी त्याच्या भाग्याचे कौतुक केले.”

श्री गुरूचरित्र – अध्याय चव्वेचाळीसावा

॥ श्रीगणेशाय नमः ॥ श्रीसरस्वत्यै नमः ॥ श्रीगुरुभ्यो नमः ॥

नामधारक म्हणे सिद्धमुनि । श्रीगुरुचरित्र तुम्ही देखिलें नयनीं ।
तुमचें भाग्य काय वानूं वदनीं । परब्रह्म देखिलें असे ॥१॥

तुमचेनि प्रसादेंसीं । अमृतपान झालें आम्हांसी ।
आतां कष्‍ट आम्हां कायसी । सकळाभीष्‍ट लाधलों ॥२॥

तुम्ही भेटलेति मज तारका । दैन्य गेलें सकळ दुःख ।
सर्वाभीष्‍ट लाधलों सुख । गुरुचरित्र ऐकतां ॥३॥

मागें कथानक सांगितलें । श्रीगुरु संगमीं राहिले ।
पुढें काय अपूर्व वर्तलें । निरोपावें दातारा ॥४॥

सिद्ध सांगे नामधारकासी । ऐक वत्सा विस्तारेंसीं ।
विचित्र झालें येरे दिवसीं । एकचित्तें परियेसा ॥५॥

‘नंदी’ नाम एक ब्राह्मण । सर्वांगीं कुष्‍ट श्वेतवर्ण ।
तुळजापुरा जाऊन । वर्षें तीन आराधिलें ॥६॥

READ  श्री गुरूचरित्र – अध्याय पाचवा

तीन संवत्सर उपवास । द्विज कष्‍टला बहुवस ।
निरोप झाला सायासें । चंदलापरमेश्वरीजवळी जाणें ॥७॥

जगदंबेचा निरोप घेऊनि । आला चंदलापरमेश्वरीस्थानीं ।
मास सात पुरश्चरणीं । पुनरपि केले उपवास ॥८॥

नानापरी कष्‍टतां । स्वप्‍न जाहलें अवचिता ।
तुवां जावें त्वरिता । गाणगग्रामस्थानासी ॥९॥

तेथें असती श्रीगुरु । त्रयमूर्तीचा अवतारु ।
वेष धरिला असे नरु । तेथें होसील उत्तमांगी ॥१०॥

ऐसे निरोप त्यासी जाहले । विप्र म्हणे भलें केलें ।
मास सात कां चुकर केलें । जरी तुझे हातीं नोहेचि ॥११॥

जगन्माता तुळजा भवानी । तिचा निरोप घेऊनि ।
आलों तुजपाशीं ठाकोनि । तूं दैवत म्हणोनियां ॥१२॥

दैवतपण ठाउकें जाहलें । आम्हांसी निरोप दिधलें ।
मनुष्यापाशीं जा म्हणितलें । तुझे हातीं नोहेचि कांहीं ॥१३॥

तूं जगद्दैवत जगदंबा म्हणविसी । आम्हां मनुष्यापाशीं पाठविसी ।
नांव जाहलें दैवतपणासी । भाग्य माझें म्हणतसे ॥१४॥

मनुष्यापाशीं जा म्हणावयासी । लाज नये कैसी तुम्हांसी ।
ओळख जाहली दैवतपणासी । उपवासी सात महिने ॥१५॥

पहिलेंचि जरी निरोप देत । इतुके कष्‍ट आम्हां न होत ।
दुराशा केली मी परदैवत । म्हणोनि, दुःख करी नानापरी ॥१६॥

ऐसें अनेकपरीनें । दुःख करीतसे तो ब्राह्मण ।
पुन्हा मागुती पुरश्चरण । करीन म्हणे तो द्विजवर ॥१७॥

म्हणे मज बरवें होणें । अथवा आपुला प्राण देणें ।
ऐसें बोलोनि निर्वाणें । विप्र धरणें बैसला ॥१८॥

पुनरपि स्वप्न तयासी । तैसेंचि होय परियेसीं ।
आणिक समस्त भोपियांसी । तेणेंचिपरी स्वप्न होय ॥१९॥

सकळ भोपे म्हणती तयासी । आजि स्वप्न झालें आम्हांसी ।
छळण न करीं गा देवीसी । निरोपासरसा जाईं वेगीं ॥२०॥

तूं तरी आतां नव जासी । आम्हां निरोप झाला ऐसी ।
बाहेर घालूं तुम्हांसी । देवळांत येऊं नेदूं ॥२१॥

इतुकें जाहलियावरी । पारणें केलें द्विजवरीं ।
पूजा करी नानापरी । निरोप घेऊनि निघाला ॥२२॥

गाणगाग्रामासी आला । मठीं जाऊनि पुसों लागला ।
भक्तजन सांगती त्याला । संगमीं आहेत गुरुमूर्ति ॥२३॥

भक्त म्हणती तयासी । श्रीगुरु येतील पारणेसी ।
काल शिवरात्री-उपवासी । आतां येतील परियेसीं ॥२४॥

इतुकिया अवसरीं । श्रीगुरु आले साक्षात्कारी ।
ग्रामलोक द्विजातें वारी । राहें दूरी नको सन्मुख ॥२५॥

श्रीगुरु आले मठांत । द्विज उभा होता चिंतीत ।
भक्तजन सांगती मात । विप्र एक आला असे ॥२६॥

सर्वांगीं असे श्वेत । स्वामिदर्शना आलों म्हणत ।
श्रीगुरु म्हणती आपण जाणत । संदेहरुपें आला असे ॥२७॥

म्हणती बोलावा मठांत । भक्त गेले धांवत ।
तया द्विजातें पाचारीत । आला विप्र आंगणा ॥२८॥

दुरोनि देखिलें श्रीगुरुसी । नमन करीत लोळे भूमीसी ।
श्रीगुरु म्हणती तयासी । संदेहरुपें आलासि कां ॥२९॥

देवीपासूनि मनुष्यापाशीं । येणें झालें काय कार्येंसी ।
संदेह करोनि मानसीं । कैसा आलासि द्विजवरा ॥३०॥

ऐसें वचन ऐकोनि । आपुले मनींचें जाणिलें म्हणोनि ।
क्षमा करीं गा स्वामी म्हणोनि । लोटांगणीं येतसे ॥३१॥

म्हणे स्वामी आपण तमांध । तुझे दर्शनें झालों सुबुद्ध ।
अज्ञानें वेष्‍टिलों होतों मंद । नेणें सोय परब्रह्मा ॥३२॥

तूं साक्षात्‌ वस्तु म्हणोनि । नेणों आपण तमोगुणी ।
आजि माझा सुदिन । दर्शनें झालों पुनीत ॥३३॥

पापकर्मी पापी आपण । पापात्मा नेणें निज खूण ।
पापें संभवलों पूर्ण । आलों शरण तुजपाशीं ॥३४॥

तूं भक्तजनां आधार । शरणागता वज्रपंजर ।
ब्रीद वानिती सचराचर । श्रीगुरु नृसिंहसरस्वतीचें ॥३५॥

आजि माझें कुकर्म गेलें । परब्रह्मचरण देखिलें ।
मनोरथ माझे पुरले । कृपासागरा यतिराया ॥३६॥

तूं भक्तजनाची कामधेनु । मनुष्यवेषीं आलासि अवतरोनु ।
तुझा पार जाणे कवणु । त्रैमूर्ति तूंचि होसी ॥३७॥

जैसी सगरांवरी गंगा । पावन करावया आली जगा ।
तैसा तूं भक्तसेवकवर्गा । तारावया अवतरलासी ॥३८॥

का अहिल्या झाली पाषाण । दिव्यदेही झाली लागतां चरण ।
तैसें मज आजि निर्गुण । झालें स्वामी गुरुनाथा ॥३९॥

व्रतबंध विवाह झालियावरी । व्याधि उद्भवली आपुले शरीरीं ।
स्त्री राहिली माहेरीं । स्पर्शों नये शरीर म्हणे ॥४०॥

आपुले असती मातापिता । सकळ म्हणती जाईं परता ।
दुःख जाहलें अपरिमिता । संसार त्यजूनि निघालों ॥४१॥

गेलों होतों तुळजापुरा । उपवास केले अपारा ।
मज म्हणती तूं पापभारा । नव्हे तुज बरवें आतां ॥४२॥

निरोप दे जा सन्नतीं । जेथें चंदलापरमेश्वरी वसती ।
तेथें होईल निवृत्ति । पाप जाईल म्हणोनि ॥४३॥

तेथेंही कष्‍ट केले बहुत । नव्हेचि कांहीं, देवी उबगत ।
निरोप झाला जा म्हणत । कृपामूर्ति तुजपाशीं ॥४४॥

ऐसें माझें दैव हीन । उबगताति देव आपण ।
मज देखोनि निर्वाण । बाहेर घाला म्हणताति ॥४५॥

देवता आपण उबगताति । मनुष्य कैसे मज देखती ।
निर्वाणीं आलों तुम्हांप्रती । निर्धार केला मरणाचा ॥४६॥

ऐसा पापी असोनि आपण । काय करावें अंग हीन ।
तोंड न पाहती कुष्‍ठी म्हणोन । मरण बरवें यापरतें ॥४७॥

READ  श्री गुरूचरित्र – अध्याय आठवा

आतां असे एक विनंति । होय अथवा नव्हे निश्चितीं ।
शीघ्र निरोपावें यति । दैवतें चाळवितीं आशाबद्धें ॥४८॥

मज चाड नाहीं शरीराची । प्राण देईन सुखेंचि ।
तूं रक्षक माउली शरणागताची । निरोपावें दातारा ॥४९॥

ऐसें करुणावचन ऐकोन । श्रीगुरु बोलती हांसोन ।
सोमनाथ ब्राह्मण बोलावून । निरोप देती न्याया संगमासी ॥५०॥

बरवा संकल्प सांगोनि । स्नान करवा षट्‌कूळभुवनीं ।
अश्वत्थप्रदक्षिणा करवूनि । वस्त्रें टाका दूर त्याचीं ॥५१॥

नवीं वस्त्रें द्या यासी । शीघ्र आणा पारणेसी ।
ऐसा निरोप देती त्यांसी । दोघे गेले झडकरी ॥५२॥

स्नान करुनि बाहेर आला । शरीरवर्ण पालटला ।
अश्वत्थप्रदक्षिणा करूं लागला । सु-वर्ण जाहलें सर्वांग ॥५३॥

वस्त्रें देती ब्राह्मणासी । जीर्ण वस्त्रें टाकिती दूरेंसी ।
जेथें टाकिती ते भूमीसी । क्षार भूमि होय त्वरित ॥५४॥

सांगातें घेऊनि द्विजासी । सोमनाथ आला मठासी ।
चरणीं घातलें तयासी । लोक सर्व विस्मित ॥५५॥

नंदीनामें केला नमस्कार । संतोषें स्तोत्र करी अपार ।
हर्षें जाहला निर्भर । लोळतसे पादुकावरी ॥५६॥

श्रीगुरु म्हणती तयासी । तुझी कामना झाली परियेसीं ।
सर्वांग आहे कैसी । अवलोकोनि पाहें म्हणती ॥५७॥

पाहतां सर्वांग बरवें जाहलें । तावन्मात्र जंघेसी राहिलें ।
पाहतां मन त्याचें भ्यालें । म्हणे स्वामी असे थोडें ॥५८॥

तुझी कृपादृष्‍टि झाली असतां । थोडें राहिलें म्हणे केवीं आतां ।
करीतसे दंडवता । कृपा करीं गा परमात्मा ॥५९॥

श्रीगुरुमूर्ति निरोपिती तयासी । तूं संशय करोनि आलासी ।
मनुष्य काय करील म्हणोनि मानसीं । तेणें गुणें राहिलेंथोडें॥६०॥

त्यासी असे एक प्रतीकार । तुवां कवित्व सांगावें अपार ।
आमुची स्तुति करावी निरंतर । बरवें होईल तुज मग ॥६१॥

नंदीनामा म्हणे स्वामीसी । लिखित नेणें वाचायासी ।
कैसें करुं मी कवित्वासी । मंदमति असे आपण ॥६२॥

काय जाणें कवित्वस्थिति । मज नाहीं काव्यव्युत्पत्ति ।
स्वामी ऐसा निरोप देती । म्हणोनि चरणीं लागला ॥६३॥

श्रीगुरु म्हणती द्विजासी । मुख उघडीं काढीं जिव्हेसी ।
विभूति शिंपिती तयासी । ज्ञान उपजलें ब्राह्मणा ॥६४॥

चरणांवरी ठेविला माथा । उभा ठेला स्तोत्र करितां ।
म्हणे स्वामी मी नेणता । सेवेसी नव्हे अराणुक ॥६५॥

मायापाशीं वेष्‍टोनि । बुडत होतों संसारगहनीं ।
आठवण न करीं कधीं मनीं । तुझे चरणा विसरलों ॥६६॥

संसार-सागर मायाजाळ । योनीं जन्मोनि चौर्‍यांशीं लक्षकुळ ।
आठवण नव्हे तुझें नाम केवळ । मंदमति जाहली मज ॥६७॥

स्वेदज अंडज उद्भिज्जेंसी । जन्मा आलों पशुयोनीसी ।
तव ज्ञान कैंचें आम्हांसी । स्थावर जंगम जैं होतों ॥६८॥

नानायोनींत मनुष्य विशेष । शूद्रादि याती बहुवस ।
जधीं होतों त्या जन्मास । काय जाणें तुझी सोय ॥६९॥

समस्त जन्मांत एक । ब्राह्मनजन्म विशेख ।
काय करावें होऊनि मूर्ख । गुरुसोय नेणे नर ॥७०॥

मातेचें शोणित पित्याचें रेत । संपर्क जहाला जननीगर्भांत ।
जैसें सुवर्ण मुशीं असे कढत । दिवस पांच बुद्‌बुदाकार ॥७१॥

पंधरा दिवसा होय स्थिर । एक रस होऊनि निर्धार ।
तधीं मी काय जाणें गुरु । नाहीं पंचतत्त्वें मज ॥७२॥

मासें एक पिंड होय । द्वय मासीं शिर पाय ।
तिसरे मासीं सर्व अवयव । नवद्वारें झालीं मग ॥७३॥

पंचतत्त्वे होतीं एक । वायु-आप-पृथ्वी-तेज-ख ।
प्राण आला तात्काळिक । तधीं स्मरण कैंचें मज ॥७४॥

पांचवे मासीं त्वचा रोम । सहावे मासीं उच्छ्वास आम्हां ।
सातवे मासीं श्रोत्र जिव्हा । मेद मज्जा दृढ जाहली ॥७५॥

ऐसे नव मास कष्‍टत । होतों जननिये-गर्भांत ।
रुधिर-विष्‍ठा-मूत्रांत । कष्‍टलों भारी स्वामिया ॥७६॥

माता भक्षी उष्ण क्षार । तेणें तीक्ष्णें कष्‍टलों अपार ।
पडे लोळे अनेक प्रकार । दुःख तेव्हां सांगूं कोणा ॥७७॥

मना आलें भक्षण करीं । दुःख होय मज अपारी ।
ऐसें नवमासवरी । मातागर्भीं कष्‍टलों ॥७८॥

तधीं कैचें तुझें स्मरण । वेष्टिलों होतों मायावरणें ।
स्मरलों नाहीं तुझे चरण । मग योनिमुखीं जन्मलों ॥७९॥

उपजतांचि आपणासी । आयुष्य लिहिलें लल्लाटेसी ।
अर्घ गेलें वृथा निशीं । रात्रीं निद्रा मानवा ॥८०॥

उरले आयुष्यांत देखा । तीन भाग केले विशेखा ।
बाल यौवन वृद्धाप्य ऐका । निर्माण झाले तये वेळीं ॥८१॥

बाळपणीं आपणासी । कष्‍ट झाले असमसाहसी ।
मज घालिती पाळणेसी । मूळमूत्रांत लोळतसें ॥८२॥

बाळपणींचें दुःख आठवितां । शोक होय मज अपरिमिता ।
काय सांगूं गुरुनाथा । नाना आपदा भोगिल्या ॥८३॥

शयनस्थानीं मलमूत्रांत । निरंतर असें लोळत ।
आपली विष्‍ठा आपण खात । अज्ञानतिमिरें वेष्टिलों ॥८४॥

एकादे समयीं आपणासी । पोटशूळ उठे बहुवसीं ।
रोदन करितां परियेसीं । स्तनपान मला करविती ॥८५॥

क्षुधाक्रांत होय बहुत । मज म्हणती पोट दुखत ।
अंगुली घालूनि मुखांत । वोखद मज पाजविती ॥८६॥

READ  श्री गुरूचरित्र – अध्याय सव्विसावा

ऐसें क्षुधेनें पीडितां बहुत । मज घालिती पाळण्यांत ।
हालविती पर्यंदें गात । क्षुधाक्रांत रुदन करीं ॥८७॥

म्हणती रुदन करितो बाळ । मुखीं शिंपिती कांजीतेल ।
रक्षा बांधिती मंत्रें केवळ । नेणे माता भूक माझी ॥८८॥

पाळण्यांत घालिती कौतुकें । प्रावरणांत असतां वृश्चिकें ।
मारीतसे पाठीं डंक । प्रलाप मी करीतसें ॥८९॥

आणिक पाळणा हालविती । राहें राहें उगा म्हणती ।
स्तनपान मागुती करविती । वृश्चिकविष नेणतां ॥९०॥

तेणें दुःखें स्तनपान न करीं । मागुती घालिती पाळण्याभीतरीं ।
वृश्चिक मज डंक मारी । प्राणांतिक मज होय ॥९१॥

माता खाय अंबट तिखट । स्तनपानें मज अपार वोखट ।
अति मधुर क्षीर अंबट । तेणें खोकतसें सर्वकाळीं ॥९२॥

नाना औषधें मज देती । तेणें माझे डोळे दुखती ।
कुंकुम लवणक्षार भरिती । डोळे आले म्हणोनियां ॥९३॥

ऐसे कष्‍ट धुरंधर । बाळपणीं जाहले अपार ।
वाढलों कष्‍ट भोगीत फार । वर्षें बारा लोटलीं ॥९४॥

तधीं तुझे चरणस्मरणा । मज कैंचें गा देवराणा ।
कष्‍टलों मी याचिगुणा । पूर्वजन्म नाठवेचि ॥९५॥

दोन भाग उरले आपणासी । मदनें व्यापिलें शरीरासी ।
जैसा पतंग दीपासी । भ्रमिजेत उन्मत्त ॥९६॥

नेणें मी गुरु माता पिता । समस्तांतें करी निंदा वार्ता ।
परस्त्रीवरी करीं चिंता । कुळाकुळ न विचारीं ॥९७॥

ब्राह्मणातें निंदा करी । वृद्धाच्या चेष्‍टा करी अपारी ।
मदें व्यापिलें असे भारी । नाठवती तुझे चरण मज ॥९८॥

मांसाचे कवळाकारणें । मत्स्य जाय जेवीं प्राणें ।
तैसा आपण मदनबाणें । वश्य जाहलों इंद्रियांसी ॥९९॥

नानावर्ण स्त्रियां भोगिलें । परद्रव्य अपहारिलें ।
सिद्धमहंतांतें निंदिलें । दृष्‍टीं न दिसे माझे कांहीं ॥१००॥

ऐसा मदनें व्यापूनि । मागें पुढें न पाहें नयनीं ।
पतंग जाय धांवोनि । दीपावरी पडे जैसा ॥१॥

ऐसा वेष्‍टोनि मदनबाणीं । न ऐके सुबुद्धि कधीं श्रवणीं ।
सोय न धरीं तुझे चरणीं । यौवनपण गेलें ऐसें ॥२॥

मग वृद्धाप्य आले शरीरासी । उबग होय स्त्रीपुत्रांसी ।
श्वासोच्छ्वास कफेसीं । सदा खोकला होय मज ॥३॥

अवयव सर्वही गलित होती । केश पांढरे होती त्वरिती ।
दंतहीन, श्रवणें न ऐकिजेति । दृष्‍टीं न दिसे, नासिक गळतें ॥४॥

ऐसा नाना रोगें कष्‍टतां । तुमची सेवा कधीं घडणें आतां ।
स्वामी तारका श्रीगुरुनाथा । संसारसागरा कडे करीं ॥५॥

ऐसा मंदमति आपण । न ओळखेचि तुझे चरण ।
तूंचि केवळ नारायण । अवतार तूं श्रीगुरुमूर्ति ॥६॥

तूंचि विश्वाचा तारक । धरोनियां नरवेष ।
त्रयमूर्ति तूंचि एक । परब्रह्म श्रीगुरुनाथा ॥७॥

दिवांध नेणती तुज लोक । तूंचि विश्वाचा पाळक ।
मी किंकर तुझा सेवक । संसार-धुरंधरीं तारीं मज ॥८॥

ऐसें नानापरी स्तोत्र । करीतसे नंदीनामा पवित्र ।
जन पाहताति विचित्र । त्यांसी म्हणे नंदीनामा ॥९॥

ऐका हो जन समस्त । श्रीगुरू जाणा परब्रह्मवस्तु ।
आपण पाप केलें बहुत । दर्शनमात्रें सर्व गलें ॥११०॥

जैसें तृणाचे बणवीसी । अग्नि लागतां क्षणें कैसी ।
गुरुकृपा होय ज्यासी । पाप जळे तयापरी ॥११॥

‘चरणं पवित्रं विततं पुराणं’ । ऐसें बोले वेद आपण ।
सेवा सेवा हो गुरुचरण । गुरुवेगळा देव नाहीं ॥१२॥

ब्रह्मदेवें आपण देखा । दुष्टाक्षरें लिहिलीं कपाळिका ।
तैसेही होय निका । श्रीगुरुचरणीं लागतां ॥१३॥

जवळी असतां निधान । कां नोळखा हो तुम्ही जन ।
नृसिंहसरस्वती कामधेनु । भजा भजा हो सकळिक ॥१४॥

इहसौख्य ज्ञान ऐका । अंतीं पावे वैकुंठलोका ।
संदेह नाहीं होईल सुखा । सत्य जाणा हो बोल माझा ॥१५॥

नंदीनामा स्तोत्र करितां । श्रीगुरु संतोषी अत्यंता ।
भक्तांसी ऐसा निरोप देत । ‘कवीश्वर’ म्हणा यासी ॥१६॥

कवि ‘बसवरस’ नाम तयासी । निर्धार केला आम्हीं भरंवसीं ।
ऐसें कृपेनें बोलती त्यासी । ऐकोनि चरणीं लागला ॥१७॥

जें कां शेष होतें जंघेवरी । तें तात्काळ गेलें दूरी ।
नंदीनामा आनंद करी । राहिला सेवा करीत देखा ॥१८॥

सिद्ध म्हणे नामधारकासी । श्रीगुरुचरित्र ऐसें परियेसीं ।
कथा करीत कवि बसवरसी । श्रीगुरुसेवेसी राहिला ॥१९॥

नामधारक म्हणे सिद्धमुनि । दुसरा कवि ‘नरहरि’ म्हणोनि ।
तो केवीं झाला शिष्य सुगुणी । कवेश्वर भक्त जाहला ॥१२०॥

तें विस्तारोनि आम्हांसी । सांगा स्वामी कृपेंसी ।
वांछा असे मानसीं । गुरुचरित्र ऐकावें ॥२१॥

म्हणे सरस्वती-गंगाधर । पुढील कथेचा विस्तार ।
ऐकतां होय मनोहर । नामस्मरण कामधेनु ॥१२२॥

इति श्रीगुरुचरित्रामृते परमकथाकल्पतरौ श्रीनृसिंहसरस्वत्युपाख्याने सिद्धनामधारकसंवादे द्विजकुष्‍टपरिहारो नाम चतुश्चत्वारिंशोऽध्यायः ॥४४॥

॥ श्रीगुरुदेवदत्त ॥          ॥ ओंवीसंख्या १२२ ॥

॥श्रीगुरुदत्तात्रेयार्पणमस्तु॥

(PDF) Download श्री गुरूचरित्र – अध्याय चव्वेचाळीसावा
श्री गुरुचरित्र सप्ताह वाचन - अध्याय ४४ | Gurucharitra Adhyay 44 । Saptah Vachan
श्री गुरूचरित्र – अध्याय चव्वेचाळीसावा

श्री गुरूचरित्र – अध्याय पंचेचाळीसावा वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

टीप: माहिती शोधण्यासाठी आणि लिहिण्यासाठी योग्य ती काळजी घेण्यात आली आहे. तरी तुम्हाला काही त्रुटी आढळल्यास कृपया कंमेंट्सद्वारे किंवा कॉन्टॅक्ट फॉर्म द्वारे आम्हाला कळवा.

Leave a Comment

Share via
Copy link