॥ श्रीगणेशाय नमः ॥
जयजयाजी महामंगला । जयजयाजी भक्तपाला ।
जयजयाजी तमालनीला । पतितपावन नरहरे ॥ १॥
हिरण्यकश्यपु महाक्रूर । सज्जनाचा शत्रू थोर ।
तयाचें तूं फाडून उदर । मरण त्याचें साधिलें ॥ २॥
प्रल्हादरक्षणासाठीं । तूं जन्मलास स्तंभापोटीं ।
रुप अनुपम जगजेठी । धारण तें करुन ॥ ३॥
दांत दाढा भयंकर । आयाळ रुळे मानेवर ।
नेत्र जेवीं खदिरांगार । ब्रह्मांड जाळूं पहाती ॥ ४॥
त्या भयंकर रुपाची । भीति नसे भक्ता साची ।
पिलें जेवीं वाघिणीचीं । अंगावर खेळती तिच्या ॥ ५॥
तुम्हां पाहून देवराया । लक्ष्मी न धजे पुढें यावया ।
ऐशा स्थितींत लागला पाया । भक्त तुझा नरहरे ॥ ६॥
तूं भक्तवत्सल लक्ष्मीकांत । ऐसें सांगत आले संत ।
पुरविशी भक्तमनोरथ । नाहीं न त्यासी म्हणसी कदा ॥ ७॥
त्या आपुल्या ब्रीदासी । जाग आतां हृषीकेशी ।
दासगणू लागला पायांसी । अभय असूं दे पांडुरंगा ॥ ८॥
गजाननाचे परम भक्त । होते कांहीं अकोल्यांत ।
तयाचीया सदनाप्रत । हमेशा यावें समर्थांनीं ॥ ९॥
चापडगांवचे बापु कृष्ण । खटाऊ शेटचें कुटुंब जाण ।
गोडू लालाचा नंदन । बच्चुलाल नाम ज्याचें ॥ १०॥
जीजीबाई पंडित । आणीकही होते बहुत ।
त्यांचीं नांवें तुम्हांप्रत । किती सांगूं विबुध हो ॥ ११॥
एके वेळीं अकोल्यांत । आले गजानन स्वामी समर्थ ।
खटाऊच्या गिरणींत । मुक्काम त्यानें ठेविला ॥ १२॥
एक भक्त मलकापुरीं । विष्णूसा नामें निर्धारी ।
त्याच्या वाटलें अंतरीं । समर्थ आणावें मलकापुरा ॥ १३॥
त्यानें आमंत्रणाचा वशिला । भास्कराच्या द्वारें लाविला ।
हाच भास्कर होता झाला । समाधिस्थ अडगांवीं ॥ १४॥
तो त्या वेळीं होता जवळ । करी कारभार अंगें सकळ ।
विष्णूसाला होतें बळ । याच भास्कर पाटलाचें ॥ १५॥
भास्कर म्हणे मलकापुरीं । चला समर्था लवकरी ।
भक्त विष्णूसाच्या घरीं । बोलावण्यास आला तो ॥ १६॥
मनोरथ येथील भक्तांचे । तुम्हीं पुरविले असती साचे ।
आतां मलकापुरीचे । लोक वाट पहाती ॥ १७॥
तईं समर्थ म्हणाले भास्करा । सध्यांच मी मलकापुरा ।
येत नाहीं जाण खरा । तूं आग्रह करुं नको ॥ १८॥
फार आग्रह करशील । तरी फजीत पावशील ।
याचा विचार करी खोल । मी न बोललों कांहीं तरी ॥ १९॥
दोरीसी दिधल्या फार ताण । ती मध्येंच तुटतसे जाण ।
मी न हलणार येथून । तूं या फंदांत पडूं नको ॥ २०॥
भास्कर बोले त्यावरी । कांहीं असो मलकापुरीं ।
चला विष्णूसाचे घरीं । हीच विनंति गुरुराया! ॥ २१॥
मी तुमचा लाडका । मसी धक्का देऊं नका ।
मी भरंवसा दिला देखा । तुम्हां घेऊनि येण्याचा ॥ २२॥
ती प्रतिज्ञा माझी पुरी । तुम्हीं करावी आज खरी ।
चला आतां स्टेशनावरी । गाडींत बसायाकारणें ॥ २३॥
ऐसा आग्रह करुन । घेऊन आला गजानन ।
मलकापुराकारण । न्यावयासी श्रोते हो! ॥ २४॥
भास्करानें विनवणी । स्टेशनमास्तरा करोनी ।
बारा जणांचा डबा त्यांनीं । खाली करविला संतास्तव ॥ २५॥
महाराज तैसेंच बैसले । ते न कांहीं बोलले ।
जागेवरुन नाहीं उठले । गाडी सुटेपर्यंत ॥ २६॥
तों गाडी सुटण्याचा । घंटा झाला अखेरीचा ।
डोळा चुकवून भास्कराचा । लीला केली ऐशा रीतीं ॥ २७॥
जो डबा मोकळा केला । तो त्यांनीं सोडून दिला ।
योगीराज जाऊन शिरला । बायकांच्या डब्यामध्यें ॥ २८॥
आधींच मूर्ति दिगंबर । स्त्रिया घाबरल्या असती फार ।
त्यांनीं वर्दी अखेर । दिली असे पोलिसाला ॥ २९॥
पोलिसाचा अधिकारी । तेथें आला सत्वरीं ।
महाराजाला धरुन करीं । खालीं ओढूं लागला ॥ ३०॥
अरे वेडया नंग्या पीरा । अक्कल कैसी तुज ना जरा ।
बायकांच्या डब्यांत खरा । येऊन कैसा बैसलास? ॥ ३१॥
हिसडा देऊन त्याच्या हाता । तेथेंच बसले तत्त्वतां ।
अधिकार्याची भीति चित्ता । मुळीं न त्यांच्या वाटली ॥ ३२॥
मग तो अधिकारी भला । स्टेशन मास्तराकडे गेला ।
म्हणे डब्यापासीं आतां चला । बायकाच्या माझ्यासवें ॥ ३३॥
दोघे डब्याजवळ आले । तों मास्तरानें पाहिलें ।
योगीराज बसलेले । बायकांच्या डब्यांत ॥ ३४॥
मास्तर पोलिसाच्या अधिकार्याला । ऐशा रीतीं बोलला ।
तुम्ही जाऊं द्यावें याला । याच डब्यांत बसून ॥ ३५॥
हा आहे संत थोर । चालता बोलता ईश्वर ।
याच्या हातें न होणार । गुन्हा तो केव्हांही ॥ ३६॥
तें ऐकून अधिकारी । बोलता झाला ऐशापरी ।
मी दिली आहे तार खरी । येविषयीं वरिष्ठाला ॥ ३७॥
आतां माझ्या हातांत । कांहीं न राहिलें यत्किंचित ।
मीं वर्दी दिली तुम्हांप्रत । तुम्ही वाटेल तें करा ॥ ३८॥
स्टेशनमास्तरांनीं । आपली टोपी काढूनी ।
बहु आदर दाखवोनी । विनंती केली महाराजा! ॥ ३९॥
तुम्हीं खालीं उतरावें । माझें एवढें ऐकावें ।
कायद्याचें आणावें । प्रयोजन आपुल्या मानसीं ॥ ४०॥
महाराज उतरले खालतीं । पुढें खटला भरला त्यांचेवरती ।
कायद्याप्रमाणें निश्चिती । जठार साहेबासमोर ॥ ४१॥
त्यांनीं फिर्याद घेतली । त्याची तारीख नेमली ।
शेगांवावरती भली । चौकाशीची श्रोते हो! ॥ ४२॥
बापुसाहेब जठार । आले शेगांवाच्यावर ।
डाक बंगल्यांत झाले स्थिर । करण्या चौकशी खटल्याची ॥ ४३॥
व्यकंटराव देसाई । अकोल्याचे होते पाही ।
तेही आले ते ठाईं । कांहीं कामानिमित्त ॥ ४४॥
महाराजांच्या खटल्याची । गांवीं पुकार झाली साचि ।
म्हणून मंडळी शेगांवाची । फार मिळाली बंगल्यावर ॥ ४५॥
तैं देसाई म्हणती जठरास । आज कोणता खटला विशेष ।
तुम्हांपुढें आहे खास । म्हणून मिळाले लोक हे ॥ ४६॥
जठार म्हणाले त्यातें । याचें कारण तुम्हांतें ।
कैसें न कळलें? वाटतें । हेंच मला आश्चर्य! ॥ ४७॥
तुमचे स्वामी गजानन । नंगे फिरती म्हणून ।
पोलिसांनीं भरुन । हा खटला पाठविला ॥ ४८॥
त्या खटल्याची चौकशी । होणार आहे आज दिवशीं ।
म्हणून वाटतें ऐसें मसी । लोक हे जमले असावेत ॥ ४९॥
हें ऐकतां भाषण । व्यकंटराव झाले खिन्न ।
बोलते झाले कर जोडून । खटला हा न चालवावा ॥ ५०॥
श्रीगजानन साधूची। योग्यता आहे थोर साची ।
मी मूर्ति भगवंताची । आहे पाहा प्रत्यक्ष ॥ ५१॥
तो विदेही पुरुष जाणा । बंधन त्याला कशाचें ना ।
तो योग्यांचा योगीराणा । वंदनीय अवघ्यांतें ॥ ५२॥
खटला भरला हीच केली । पोलिसांनीं चूक भली ।
ती पाहिजे दुरुस्त झाली । आज आपुल्या करानें ॥ ५३॥
जठार म्हणती वकिलाला । तुम्ही जाणतां कायद्याला ।
याचा पाहिजे होता केला । विचार तो पोलिसांनीं ॥ ५४॥
कारकुना म्हणती बोलावणें । धाडा गजाननाकारणें।
तें ऐकून एक त्यानें । जवान पोलिस पाठविला ॥ ५५॥
तो येऊन समर्थासी । म्हणे चला आतां कचेरीसी ।
अधिकार्यानें तुम्हांसी । मज धाडिलें बोलावण्या ॥ ५६॥
बर्या बोलानें चलावें । फजितीस ना करुन घ्यावें ।
ना तरी मला लागेल न्यावें । तुमच्या हाता धरुन ॥ ५७॥
तईं वदले गजानन । आम्ही न उठूं येथून ।
तुझें पहातों शिपाईपण । ये धरीं माझ्या करा ॥ ५८॥
शिपायाचा हात धरिला । तो ना सुटे किमपि त्याला ।
रक्तप्रवाह बंद झाला । त्या दाबाच्या योगानें ॥ ५९॥
हातासी लागली कळ । जीव झाला व्याकुळ ।
करुं लागला तळमळ । शिपाई तो त्याच ठाईं ॥ ६०॥
शिपायासी वेळ झाला । म्हणून पाठविलें वकिलाला ।
त्या व्यंकटराव देसायाला । समर्थासी आणावया ॥ ६१॥
जठार म्हणती तुम्हीं जावें । समर्थासी घेऊन यावें ।
लोकांसी न जमूं द्यावें । बंगल्याभोंवतीं निरर्थक ॥ ६२॥
इतक्यांत आला समाचार । पोलिसाचा धरला कर ।
बसविला एक्या जागेवर । महाराजांनीं सहज लीलें ॥ ६३॥
मग देसाई तेथें आले । त्यांच्या भक्तासी बोलले ।
या वेळीं नेसविलें । पाहिजे समर्थां धोतर ॥ ६४॥
ऐसी सल्ला मिळतांक्षणीं । धोतर नेसविलें भक्तांनीं ।
तें टाकिलें सोडोनी । समर्थांनीं रस्त्यांत ॥ ६५॥
गेले नागवे कचेरीस । सवें होतां भास्करशिष्य ।
जठारांनीं पाहतां त्यास । दिली खुर्ची बसावया ॥ ६६॥
या महाराज बसा येथ । तुम्ही नागवे गांवांत ।
कां फिरतां सदोदित । हें कांहीं बरें नव्हे ॥ ६७॥
नागवें फिरणें हाच गुन्हा । कायद्यांनीं ठरविला जाणा ।
म्हणून विनंति आपणा । द्या हें सोडून नंगेपण ॥ ६८॥
ऐसें जठारांचें भाषण । घेतलें स्वामींनीं ऐकून ।
आणि केलें हास्य वदन । उत्तर त्यासी द्यावया ॥ ६९॥
तुला काय करणें यासीं । चिलीम भरावी वेगेंसी ।
उगीच नसत्या गोष्टीशीं । महत्त्व न यावें निरर्थक ॥ ७०॥
तें ऐकतां भाषण । जठार गेले विरघळोन ।
जनरीतीचें याला भान । मुळींच नाहीं राहिलें ॥ ७१॥
हा वृषभदेव भागवतीचा । किंवा शुकाचार्य साचा ।
किंवा वामदेवाचा । हा दुसरा अवतार ॥ ७२॥
हा निजानंदीं सदा रत । खचित आहे जीनन्मुक्त ।
नये लावितां याप्रत । गुन्हा विचारें केव्हांही ॥ ७३॥
जेवीं अग्नीचा अग्नीपणा । अग्नि सोडीत नसे जाणा ।
परी अग्निहोत्र्यांना । कुंडांत ठेवणें भाग त्यासी ॥ ७४॥
अग्निदेव म्हणोन । ठेविल्या कुंडावांचून ।
तो करील दग्ध सदन । हा दोष त्याचा नसे ॥ ७५॥
तैसें याचें नागवेपण । आहे अग्निचे समान ।
म्हणून याचा शिष्यगण । आहे अपराधी येविषयीं ॥ ७६॥
वस्त्ररुपी कुंडाठायीं । जरी हा ठेविला असतां पाही ।
तरी हरकत नव्हती कांहीं । सर्वांस सुखद होतें तें ॥ ७७॥
ऐसा विचार पूर्ण केला । जठरांनीं चित्तीं भला ।
आणि हुकूम फर्माविला । त्यांनीं पुढीलप्रमाणें ॥ ७८॥
महाराज मूळचे जीवन्मुक्त । त्या ठेवणें व्यवस्थित ।
भास्कराचें काम सत्य । होतें न तें केलें त्यांनीं ॥ ७९॥
म्हणून मीं भास्कराला । पांच रुपये दंड केला ।
ऐसा खटल्याचा निकाल झाला । जठारापुढें शेगांवीं ॥ ८०॥
समर्थ म्हणाले भास्करासी । पुन्हा ऐशा आग्रहासी ।
करशील कां सांग मशीं । निज फजिती करुन घ्याया? ॥ ८१॥
भास्कर कांहीं न बोलला । मौन धरुन राहिला ।
तेथोन मंडळींनीं केला । ऐशा प्रकारें विचार ॥ ८२॥
समर्थासी अग्निरथीं । न बसवा येथून कल्पांतीं ।
विनाकारण कटकटी होती । तें कांहीं बरें नव्हे ॥ ८३॥
हा क्रम कित्येक दिवस । चालला असे शेगांवास ।
भक्त बैलाच्या गाडीस । बसवूं लागले महाराजा ॥ ८४॥
या रीतीं अकोल्यासी । आले एकदां पुण्यराशी ।
बापुरावाच्या सदनासी । जाऊनियां उतरले ॥ ८५॥
याच वेळीं यवन जातीचा । साधु महताबशा नांवाचा ।
होता कुरुम गांवीं साचा । मूर्तिजापुरा सन्निध ॥ ८६॥
त्यानें बापुरावाप्रती । सांगितलें होतें ऐशा रीतीं ।
जेव्हां समर्थ अकोल्यास येती । तेव्हां आम्हां कळवावें ॥ ८७॥
अकोल्यांत आल्यावर । श्रीगजानन साधुवर ।
बापुरावानें सत्वर । मनुष्य धाडिला कुरुमासी ॥ ८८॥
तों ऐशा रीतीं घडून आलें । महातबशा येण्या निघाले ।
अकोल्यास याया भले । समर्थासी भेटावया ॥ ८९॥
अकोल्याचा मनुष्य । मध्यें भेटला रस्त्यास ।
जो आला होता न्यावयास । महताबशाकारणें ॥ ९०॥
तो मनुष्य भेटतांक्षणीं । कीं पुसूं लागले मधुरवचनीं ।
त्या मनुष्यालागुनी । महताबशा श्रोते हो! ॥ ९१॥
तूं न जावें कुरुमाला । बैस आमच्या गाडीला ।
आपण जाऊं स्टेशनाला । मीच आहे महताबशा ॥ ९२॥
पाहा संत आल्याचें वर्तमान । कळलें संतालागून ।
कोणी न सांगतां जाण । त्रिकालज्ञ ते खरोखरी ॥ ९३॥
महताबशाच्या संगातें । दोन चार यवन होते ।
अवघे येऊन सदनातें । उतरले बापुरावाच्या ॥ ९४॥
दुसरे दिवशीं प्रातःकाळा । महताबशा होता जेथें बसला ।
महाराज आले तया स्थळा । निजलीलें करुन ॥ ९५॥
महताबशाचे धरुन केंस । समर्थांनीं ताडिलें त्यास ।
त्या ताडण्याचा उद्देश । हाच होता विबुध हो! ॥ ९६॥
यवनजातींत जन्मून । कांहीं न केला उपयोग जाण ।
यवनाचें आंडदांडपण । नाहीं अजून गेलें रे ॥ ९७॥
या आडदांडपणांनीं । तत्त्वघात होईल जाणी ।
मृत्युलोकींचे अवघे प्राणी । चिंताग्रस्त होतील ॥ ९८॥
तुझें महताब आहे नांव । त्याची काय आठवण ठेव ।
दोषरुपी तमा वाव । तुझ्यापुढें मिळूं नये ॥ ९९॥
हा द्वेषरुपी अंधार । वाढत चालला वरचेवर ।
याची नाहीं तुला खबर । म्हणून तुजला ताडिलें ॥ १००॥
ऐसा मिळतां इशारा । महताबशातें तोषला खरा ।
साधूच साधूच्या अंतरा । जाणताती निःसंशय ॥ १॥
जेव्हां महताबशा तें ताडिलें । तईं संगतीचे यवन भले ।
कावरेबावरे होते झाले । तो प्रकार पाहून ॥ २॥
महताबशा बोलला त्यासी । तुम्ही न राहावें । आम्हांपासीं ।
जावें निघून कुरुमासी । हेंच आहे उत्तम ॥ ३॥
शेख कडू शिवाय जाण । गेले चौघे निघून ।
तो द्यावयासी आमंत्रण । बच्चुलाल पातला ॥ ४॥
म्हणे उद्यां दयाघना! । यावें तुम्हीं भोजना ।
या दासाचिया सदना । हीच आहे विनंति ॥ ५॥
दुसरे दिवशीं तांग्यांत । बसवूनी समर्थाप्रत ।
मोठया थाटांनीं मिरवीत । निज सदना आणिलें ॥ ६॥
परी समर्थ तांग्याखालीं । उतरले नाहींत मुळीं ।
तेणें मंडळी चिंतावली । म्हणे कां ना उतरती हे ॥ ७॥
तसाच तांगा नेला परत । बापुरावाच्या सदनाप्रत ।
मंडळी पडली घोटाळ्यांत । समर्थें ऐसें कां केलें? ॥ ८॥
काल आमंत्रण घेतलें । आज तांग्याखालीं न उतरले ।
याचें कारण शोधिते झाले । आपापल्या बुद्धीनें ॥ ९॥
त्यांत होता एक धूर्त । तो बोलला अवघ्यांप्रत ।
मला समजलें इंगित । या गोष्टीचें ये वेळां ॥ ११०॥
महताबशाला वगळीलें । म्हणून महाराज नाहीं उतरले ।
भोजनाचें कां न केलें । महताबशाला आमंत्रण ॥ ११॥
आतां घेऊन दोघांसी । बसून एका तांग्यासी ।
म्हणजे ते निश्चयेंसी । उभयतांही येतील ॥ १२॥
तेंच वाक्य खरें झालें । दोघांलाही मिरवीत नेलें ।
महताबशाला उतरविलें । मंदिराजवळील थेटरांत ॥ १३॥
श्रीरामाच्या मंदिरीं । गजाननाची उतरली स्वारी ।
परी तेही गेले अखेरी । उठोनियां थेटरांत ॥ १४॥
अवघ्यांचीं झालीं भोजनें । मग महताबशा लोकांस म्हणे ।
मला तुम्ही तिकिट देणें । पंजाबचें काढून ॥ १५॥
तैं शेख कडू बोलला । त्या महताबशा फकिराला ।
तुम्ही कुरुमच्या मशीदीला । टाकून कैसें जातां हो? ॥ १६॥
ती मशीद बांधून । पंजाबाशीं जावें आपण ।
काम अर्धें टाकून । जाणें उचित नसे तुम्हां ॥ १७॥
महताब शेख कडूशीं । बोलता झाला प्रेमेशीं ।
आग्रह करुं नका मशी । ये वेळीं निरर्थक ॥ १८॥
गजाननाचा हुकूम झाला । मजसी पंजाबांत जाण्याला ।
आतां एक क्षणही या स्थळा । मी न राहूं शके हो ॥ १९॥
समर्थाच्या कृपेंकरुन । मशिदीचें काम पूर्ण ।
होईल हें माझें वचन । सत्य तुम्ही मानावें ॥ १२०॥
धर्माविषयीं द्वैत । संताठाईं नसतें सत्य ।
तें अवघ्यां धर्माप्रत । समसमान मानिती ॥ २१॥
खुळें देऊळ मशिदीची । तुम्ही नका वाढवूं साची ।
ती वाढतां दोघांची । आहे हानि होणार ॥ २२॥
सामान देऊळ मशिदीचें । एकची आहे साचें ।
आकारानें भिन्नत्व त्याचें । मानून भांडूं नये हो ॥ २३॥
यवन तेवढा खुदाचा । आणि हिंदु काय भूताचा? ।
पोक्त विचार करा याचा । मनुष्यपण टिकवावया ॥ २४॥
तरीच होईल कल्याण । हिंदु आणि मुसलमान ।
हीं एकाच देवापासून । निर्माण असती जाहले ॥ २५॥
धर्म बापा ज्याचा त्यांनीं । प्रिय मानावा प्राणाहूनी ।
परी विधर्म्यांच्या ठिकाणीं । अलोट प्रेम धरावें ॥ २६॥
हें न झालें जोंवरी । सौख्य लांब तोंवरी ।
जा मशीद होईल पुरी । गजाननाच्या कृपेनें ॥ २७॥
महताबशा निघून गेले । पुनः न इकडे परत आले ।
या गोष्टीचें पाहिजे केलें । मनन हिंदुयवनांनीं ॥ २८॥
पाहा महताबशाला जरी । ताडिते झाले साक्षात्कारी ।
परी द्वेष नव्हता अंतरीं । प्रेम अलोट होतें हो ॥ २९॥
शाहालागीं घेतल्या । विना । भोजना न गेला योगीराणा ।
हे मुद्दे मनीं आणा । या गोष्टींचे श्रोते हो! ॥ १३०॥
असो या बापुरावाची । कांता एक होती साची ।
तिला भानामतीची । बाधा होती विबुध हो! ॥ ३१॥
मळवट यावा घटकेंत । घटकेमाजीं कंठीं तात ।
घटकेमाजीं वस्त्रांप्रत । अग्नी तो लागावा ॥ ३२॥
बिब्याच्या पाठीवर । फुल्या याव्या अपरंपार ।
कधीं दांडीवरील चीर । जळून जावें अकस्मात ॥ ३३॥
या भानामतीच्या त्रासांनीं । ती बापुरावाची कामिनी ।
क्षीण गेली होवोनी । अन्नपाणी न रुचे तिला ॥ ३४॥
भानामती काढण्याला । बापुरावें जाणत्याला ।
आणले बाहून अकोल्याला । परी न झाला उपयोग ॥ ३५॥
खर्चहि झाला अतोनात । गुण न आला किंचित ।
अखेर त्यानें जोडिले हात । श्रीगजाननस्वामीला ॥ ३६॥
महाराज माझ्या कुटुंबाला । भानामतीचा त्रास झाला ।
केले नाना उपायाला । आतां मात्र कंटाळलों ॥ ३७॥
तुझीं पाउलें माझ्या घरा । आज लागलीं गुरुवरा! ।
तेथेंच कां आसरा । भानामतीस मिळावा? ॥ ३८॥
ज्या दरींत पंचानन । बसला आहे येऊन ।
तेथेंच कां ओरडून । दिमाख दाखवावा कोल्ह्यांनीं ॥ ३९॥
जेथें कस्तुरी दरवळली । तेथेंच कां हो रहावी भली ।
गुरुराया ही ओंगळी । घाण भानामतीची ॥ १४०॥
ऐसी विनंती ऐकून । गजाननांनीं अवलोकन ।
केलें निजकृपें करुन । बापुराव कांतेला ॥ ४१॥
त्यायोगें श्रोते तिची । भानामती निमाली साची ।
नाहीं किंमत माकडाची । सिंहाचिया पुढें हो ॥ ४२॥
असो एकदां फिरत फिरत । महाराज आले आकोटांत ।
नरसिंगजीला भेटण्याप्रत । बंधु आपला म्हणोनी ॥ ४३॥
त्याच्या मठाशेजारीं । एक विहीर होती खरी ।
जाऊन त्या विहिरीवरी । बसले गजाननमहाराज ॥ ४४॥
पाय आंत सोडिले । डोकावून पाहूं लागले ।
आंतील जलालागीं भले । वरच्यावरी श्रोते हो ॥ ४५॥
पाहून त्यांची ऐशी कृति । लोक साशंक झाले चित्तीं ।
नरसिंग महाराज विचारती । अरे हें काय करतोस! ॥ ४६॥
गोदा यमुना भागीरथी । तुम्हांसाठीं येथें असती ।
आणखी तीर्थें आहेत किती । हें पाहातों डोकावून ॥ ४७॥
तुला त्यांचें घडतें स्नान । मी कां राहूं तसाच जाण! ।
या तीर्थांनीं मला स्नान । आज येऊन घालावें ॥ ४८॥
त्यांनीं स्नान घातल्याविना । मी न येथून हले जाणा ।
ऐशा ऐकून भाषणा । कैक म्हणाले या रीतीं ॥ ४९॥
खरोखरी हा आहे पिसा । शेगांव नादीं लागला कैसा! ।
जरा थांबा येथेंच बसा । काय करी हा पाहुं पुढें ॥ १५०॥
तों विहिरींतील जलाप्रत । उकळ्या उठल्या अगणित ।
श्रोते एका निमिषांत । विहीर भरली पाण्यानें ॥ ५१॥
हजारों कारंज्याच्या परी । गजाननाच्या अंगावरी ।
वर्षूं लागले पहा वारी । त्या विहिरीचें तेधवां ॥ ५२॥
लोकां म्हणती गजानन । या रे स्नानालागून ।
नाहीं उरलें प्रयोजन । विहिरीमाजीं उतरण्याचें ॥ ५३॥
गंगा यमुना गोदावरी । वरता आली आहे खरी ।
स्नान साधा ये अवसरीं । या पुण्य सरितेचें ॥ ५४॥
भाविकांनीं केलें स्नान । निंदकांनीं खालीं मान ।
घातली तो पाहून । प्रकार त्या पाण्याचा ॥ ५५॥
संत जें जें आणती मनीं । तें तें पुरवी चक्रपाणी।
त्यांच्या वाणीलागुनी। असत्यता न दे परमात्मा ॥ ५६॥
स्नान होतां समर्थ उठले । पाणी पहिल्यापरि झालें ।
विहिरीच्या त्या तळास गेलें । उकळ्या बंद जाहल्या ॥ ५७॥
नरसिंगजीसी भेटून । निघून गेले दयाघन ।
शेगांवासी बैसून । मनोवेगाच्या वारुवरी ॥ ५८॥
स्वस्ति श्रीदासगणूविरचित । हा गजाननविजय नामें ग्रंथ ।
तारक होवो भवाब्धींत । भाविक भक्तांकारणें ॥ १५९॥
शुभं भवतु । श्रीहरिहरार्पणमस्तु ॥
॥ इति सप्तदशोऽध्यायः समाप्तः ॥
(PDF) Download श्री गजानन विजय ग्रंथ – अध्याय सतरावा
श्री गजानन विजय ग्रंथ – अध्याय अठरावा वाचण्यासाठी येथे क्लिक करा.