श्री गजानन विजय ग्रंथ – अध्याय अठरावा

॥ श्रीगणेशाय नमः ॥

जयजयाजी चिद्रिलासा । हे गोविंदा श्रीनिवासा ।
हे आनंदकंदा परेशा । पाहि माम् दीनबंधो ॥ १॥

हे केशवा केशीमर्दना । हे माधवा मधूसुदना ।
हे पूतनाप्राणशोषणा । पांडुरंगा रुक्मिणीपते ॥ २॥

काय माझ्या आहे मनीं । तें तूं जाणसी चक्रपाणी ।
तेंच का रे तुजलागुनी । बोलून दावूं पद्मनाभा ॥ ३॥

भक्त जी जी इच्छा करी । ती तूं पुरविसी श्रीहरी ।
ऐसें पुराणाभीतरीं । आहे वर्ण्न बहुसाळ ॥ ४॥

म्हणून माझ्या मनोरथा । पूर्ण करा पंढरीनाथा ।
सोडा मनींची कठोरता । दासगणू हा तुझा असे ॥ ५॥

अकोटाचे शेजारीं । मुंडगांव नामें एक नगरीं ।
तेथें बायजा नामें खरी । समर्थाची भक्तीण असे ॥ ६॥

हळदी माळ्याच्या वंशांत । इचा जन्म झाला सत्य ।
शिवराम नामें इचा तात । भुलाबाई जननी असे ॥ ७॥

बायजाचे बाळपणीं । लग्न झालें होतें जाणी ।
ललाटीं जें विधात्यांनीं । लिहिलें असेल तेंच घडे ॥ ८॥

बायजा आली तारूण्यांत । गर्भाधान करण्याप्रत ।
घेऊन गेला तिचा तात । जामाताच्या गृहासी ॥ ९॥

परी उपयोग नाहीं झाला । जामात षंढ होता भला ।
तेणें जनकजननीला । शिक झाला अनावर ॥ १०॥

बायजेकडे पाहून । जननी करी रोदन ।
माझ्या बाईचें तारूण्य । वांझ पाहूं राहातें ॥ ११॥

भुली म्हणे शिवरामासी । बायजा न ठेवा ऐशी ।
दुसरा नवरा करून इसी । देणें आहे भाग पाहा ॥ १२॥
शिवराम म्हणे त्यावर । ऐसा नको सोडूं धीर ।
हा पुरुषत्वाचा प्रकार । खरा एकदम कळेना ॥ १३॥

कांहीं दिवस वाट पाहूं । नको ऐसी अधीर होऊं ।
बायजासी येथेंच ठेवूं । तिच्या सासुरवाडीला ॥ १४॥

नपुसकत्व अधोपरी । आलें असेल त्याला जरी ।
तें औषधानें होईल दुरी । वाट पाही यास्तव ॥ १५॥

ऐसें उभयतां बोलून । बायजासी तेथें ठेवून ।
आले मुंडगांवाकारण । आपुल्या घरातें ॥ १६॥

बायजीचें वय पंधरासोळा । वर्ण काळासावळा ।
तारुण्यानें मुसमुसला । होता जिचा शरीरभाग ॥ १७॥

डोळे नाक पाणीदार । बांधा उंच मनोहर ।
जिला पाहातां अंतर । कामुकाचें मोहित होई ॥ १८॥

तिच्या थोरल्या दिरासी । पाहूनियां बायजासी ।
इच्छा जाहली मानसीं । संभोग तिचा करावया ॥ १९॥

त्यानें प्रयत्न केले नाना । वळवावया तिच्या मना ।
म्हणूं लागला क्षणक्षणा । ऐसें बायजाकारणें ॥ २०॥

हताश ऐशी मुळीं न होई । मीच तुला पतीचे ठायीं ।
आमरण करीन पाही । तुझें वेडे संगोपन ॥ २१॥

झुरणें दे हें सोडून । आनंदित ठेवी मन ।
वेडे आजपासून । मीच नवरा समज तुला ॥ २२॥

ऐसें त्यानें सांगावें । चाळे नाना करावें ।
कांहीं आमिष दावावें । चित्त तिचें भुलवाया ॥ २३॥

परी उपयोग होईना । बायजीच्या न हें येई मना ।
ती म्हणे हे नारायणा! । कां रे दैन्य मांडलेंस? ॥ २४॥

बाळपणापासून । ध्याइले मीं तुझे चरण ।
त्याचेंच कां हें मजलागून । फल दृष्टीं पडावें ॥ २५॥

जयाचा मीं हात धरिला । तो ना पुरुष कळून आला ।
दैवयोग समजून चुकला । संसार नशिबीं नाहीं मम ॥ २६॥

बरें झालें तुझ्याठायीं । चित्त आतां रमेल पाही ।
कृपा करीरे शेषशायी । स्पर्श पुरुषाचा न होवो मला ॥ २७॥

ज्येष्ठ दीर एके दिवसीं । येता झाला बायजापासीं ।
आपला हेतु कळविण्यासी । रात्रीचिया समयाला ॥ २८॥

तों बायजानें इनकार । करून केलें उत्तर ।
कैसी लाज तिळभर । नाहीं उरलीं चित्तीं तुझ्या ॥ २९॥

तूं माझा ज्येष्ठ दीर । पित्यापरीस साचार ।
सोडा हा अविचार । स्वैर ऐसा होऊं नको ॥ ३०॥

ह्या तियेच्या भाषणा । तो ना आणी मुळीं मना ।
होतां कामाची वासना । नीति विलया जातसे ॥ ३१॥

अंगावरी टाकण्या हात । जों तो पाही इतक्यांत ।
तयाचा तो थोरला सुत । माडीवरून पडला हो ॥ ३२॥

खोक पडली डोक्यासी । बायजेनें धरिलें त्यासी ।
बसवून आपुल्या मांडीसी । औषध लावूं लागली हो ॥ ३३॥

बायजा म्हणे ज्येष्ठ दीरा । या गोष्टीचा विचार करा ।
अभिलाष तो नाहीं बरा । परस्त्रियेचा केव्हांही ॥ ३४॥

मुलगा पडलेला पाहून । भय पावलें त्याचें मन ।
अनुताप त्यासी झाला पूर्ण । केलेलिया कर्माचा ॥ ३५॥

त्यानें नाद सोडिला । सदनीं निवांत राहिला ।
पुढें शिवराम घेऊन गेला । कन्येस आपुल्या मुंडगांवीं ॥ ३६॥

भुलाई म्हणे पतीसी । चला जाऊं शेगावांसी ।
महाराजातें पुसायासी । पुढील भाकीत बायजेचें ॥ ३७॥

तें मानेलें शिवरामासी । आला घेऊन कन्येसी ।
महाराजांतें पुसायासी । आपुल्या त्या कांतेसह ॥ ३८॥

बायजा घातली पायांवर । केली विनंति जोडून कर ।
कृपा करा या मुलीवर । पुत्र पौत्र द्यावे हिला ॥ ३९॥

तें समर्थांनीं ऐकिलें । शिवरामासी हांसत वदले ।
अरे नशिबीं नाहीं लिहिलें । विधात्यानें पुत्र हिच्या ॥ ४०॥

जेवढे पुरुष जगतांत । तेवढे असती हिचे तात ।
उगे न पडा फंदांत । लग्न हिचें करण्याच्या ॥ ४१॥

तें ऐकतां शिवरामाला । अनावर शोक झाला ।
घेऊन त्या बायजाला । परत आला मुंडगांवीं ॥ ४२॥

परी त्या समर्थवचनांनी । बायजा आनंदली मनीं ।
निष्ठा गजाननाच्या चरणीं । जडली तेव्हांपासून ॥ ४३॥

समर्थांचा एक भक्त । पुंडलिक नामें मुंडगांवांत ।
त्याच्या संगें शेगांवांत । बायजा येऊं लागली ॥ ४४॥

पहिल्या प्रथम अडथळा । जननीजनकें नाहीं केला ।
शेगांवांस जाण्याला । पुंडलिकाचे बरोबर ॥ ४५॥

त्यांना ऐसें वाटलें । साधुचरण इनें धरिले ।
तेच तिच्या करतील भले । निजकृपेनें कल्याणा ॥ ४६॥

पुरुषत्व देतील जामातासी । अशक्य ना कांहीं संतांसी ।
ऐसा विचार मानसीं । करून राहिले स्वस्थ ते ॥ ४७॥

पुंडलिकाचे बरोबरी । बायजा जाऊं लागली खरी ।
तेणें पुकार जगभरी । ऐशा रीतिं जाहली ॥ ४८॥

हें शेगांवच्या वारीचें । ढोंग आहे दोघांचें ।
तरुणपणीं मानवाचें । मन परमार्थी लागेना ॥ ४९॥

बायजा आहे तरणीज्वान । पुंडलिकासीही तारुण्य ।
यांची वारी विषयभान । हीच आहे निःसंशय ॥ ५०॥

परस्परें प्रीति जडली । विषयसुखाची नवाळी ।
भोगण्या ही युक्ति केली । वाटते या उभयतांनीं ॥ ५१॥

READ  श्री गजानन विजय ग्रंथ - अध्याय चौदावा

पुंडलिक जरी माळी असता । तरी हा संबंध योग्य होता ।
बायजाच्या धरण्या हाता । कां कीं तरुण दोघेही ॥ ५२॥

पुंडलिक आहे मराठी । ही माळ्याच्या आली पोटीं ।
म्हणून यांची ताटातुटी । केलीच पाहिजे जातीस्तव ॥ ५३॥

या दोघांचें अंतर । शुध्द होतें साचार ।
नव्हता कामाचा विकार । मनीं उत्पन्न जाहला ॥ ५४॥

भुलाई म्हणे बायजासी । तूं कां कारटे अहर्निशीं ।
पुंडालिकाच्या घरा जासी । हें कांहीं कळेना ॥ ५५॥

ऐशा तरुण वयांत । तुम्हां कशाचा परमार्थ? ।
कोल्हा न राही उपोषित । उंसाचिया फडामधीं ॥ ५६॥

वा पाहून बाटुकाला । बैल नाहीं पुढें गेला ।
कारटे आमुच्या नांवाला । काळें उगें लावूं नको ॥ ५७॥

भुलाई म्हणे नवर्‍यासी । हिला नका ठेवूं ऐसी ।
लावून द्यावे मोहतरासी । पाहा पोरगा माळ्याचा ॥ ५८॥

ही पुंडलिकाच्या घरीं जाते । सदा त्यासी हितगुज करिते ।
एकमेकां पाहून भरतें । येत दोघां प्रेमाचें ॥ ५९॥

जाऊं चला शेगांवास । घेऊन या कारटीस ।
सांगूं अवघे महाराजास । चाळे या बायजीचे ॥ ६०॥

संतासी अवघें कळतें । ते सन्न्तीचे चाहाते ।
पोटामाजीं कधीं न निघते । चंदनाच्या दुर्गंधी ॥ ६१॥

भुला-शिवराम-बायजाबाई । पुंडलीक भोकर्‍या आला तोही ।
चौघे येऊन लागले पाई । शेगांवीं श्रीसमर्थांच्या ॥ ६२॥

पुंडलिकासी पाहून । बोलूं लागले दयाघन ।
कीं बायजा तुझी बहीण । पूर्व जन्मींची पुंडलिका ॥ ६३॥

लोक निंदा जरी करिती । तरी अंतर न द्यावें इजप्रती ।
दोघें मिळून करा भक्ति । सच्चिदानंद हरीची ॥ ६४॥

भुले आपुल्या पोरीस । लावूं नको भलता दोष ।
हीं बहीण-भाऊ आहेत । मुळींच पूर्वजन्मींचें ॥ ६५॥

शिवाय या बायजीला । कोठेंहि न नवरा भला ।
ही न आली करायाला । संसार मुळीं जगामध्यें ॥ ६६॥

ही राहील ब्रह्मचारी । अशीच गे जन्मवरी ।
जनाबाई पंढरपुरीं । अशाच रीतीं राहिली गे ॥ ६७॥

तिनें नामदेव गुरु केला । ही शरण आली आम्हांला ।
माझ्या जनाबाईला । कोणी ना आतां छळावें ॥ ६८॥

ऐसें समर्थांचें भाषण । शिवरामानें ऐकून ।
गेला असे गहिंवरून । शब्द न कांही बोलवे ॥ ६९॥

घेऊन आपुल्या मुलीला । शिवराम मुंडगांवासी आला ।
पुढें बायजाच्या वारीला । अडथळा कोणी केला नसे ॥ ७०॥

महाराज आपुल्या भक्ताप्रत । सदैव रक्षण करितात ।
ते कसे, ही थोडक्यांत । गोष्ट सांगतों ये ठाई ॥ ७१॥

भाऊ राजाराम कवर । एक होता डाँक्टर ।
पहा खामगांवावर । दवाखान्याचा अधिकारी ॥ ७२॥

त्यास दुर्धर फोड झाला । आणविला मोठ्या डाँक्टराला ।
औषधपाणी करायाला । खामगांवामाझारीं ॥ ७३॥

बुलढाणा अकोला उमरावती । येथून डाँक्टर आणिले असती ।
शस्त्रक्रिया करण्याप्रती । त्या भाऊच्या फोडाला ॥ ७४॥

नाना औषधें पोटांत दिलीं । विविध पोटीसें बांधिलीं ।
शस्त्रक्रिया ही असे केली । त्या झालेल्या फोडाला ॥ ७५॥

कशाचा ना उपयोग झाला । फोड वाढुं लागला ।
वडील बंधूस धाक पडला । त्या भाऊच्या दुखण्याचा ॥ ७६॥

भाऊ तळमळे शय्येवरी । व्याधि असह्य झाली खरी ।
शेवटीं त्यानें अंतरीं । विचार ऐसा केला हो ॥ ७७॥

आतां हाच उपाय । आठवावे सद्गुरुपाय ।
याविणें दुसरी सोय । कांहीं नसे राहिली ॥ ७८॥

पडल्या पडल्या जोडी हात । म्हणे धांव धांव हे सद्गुरुनाथ ।
या लेंकराचा वृथा अंत । किमपि आतां पाहूं नका ॥ ७९॥

ऐशी श्रोते विनवणी । करूं लागला क्षणोक्षणीं ।
रात्र गेली उलटोनी । सुमारें समय एकाचा ॥ ८०॥

तमानें भरलें अंबर । रात्रीचा तो शब्द किर्र ।
कोल्हे-हुकेनें कांतार । दणाणून गेलें हो ॥ ८१॥

तो एक दमणी आली । तट्ट्यावरी लागलेली ।
गाडीस होती जुंपिली । जोडी खिलार्‍या बैलांची ॥ ८२॥

कंठामाजीं घागरमाळा । वाजूं लागल्या खळखळा ।
मागें पुढें सोडिला । होतां पडदा दमणीस ॥ ८३॥

दवाखान्याच्या दारापाशीं । दमणी आली निश्चयेंसी ।
डाँक्टर पाहात होता तिसी । पडून आपल्या शय्येवर ॥ ८४॥

तों एक उतरला । ब्राह्मण दमणीला खालीं भला ।
दार ठोठावूं लागला । डाँक्टराच्या बंगल्याचें ॥ ८५॥

डाँक्टराच्या बंधूंनीं । दार उघडलें ते क्षणीं ।
प्रश्न केला कोठूनी । आपण आलांत ये ठायां? ॥ ८६॥

ब्राह्मण बोले त्याकारण । माझें गजा नामाभिधान ।
तीर्थअंगारा घेऊन । शेगांवाहून आलों मी ॥ ८७॥

डाँक्टर भाऊ कवराला । जो का आहे फोड झाला ।
हा अंगारा पाठविला । लावण्या त्या फोडासी ॥ ८८॥

प्यावयासी दिलें तीर्थ । हें घ्या आपुल्या हातांत ।
मी जातों आतां परत । वेळ न मशी राहावया ॥ ८९॥

तीर्थअंगारा देऊन । निघून गेला ब्राह्मण ।
त्या शोधाया कारण । भाऊनें शिपाई पाठविला ॥ ९०॥

परी न पत्ता लागला । गाडी न दिसली कवणाला ।
भाऊ मनीं घोटाळला । कशाचा ना तर्क चाले ॥ ९१॥

फोडास लावितां अंगारा । तो तात्काळ फुटला खरा ।
येऊं लागला भराभरा । पूं त्या श्रोते फोडांतून ॥ ९२॥

एक घटका गेल्यावर । पूं गेला निघून पार ।
पाहा किती आहे जोर । समर्थाच्या अंगार्‍याचा? ॥ ९३॥

भाऊस निद्रा लागली । व्याधीं पुढें बरी झाली ।
हळूहळू शक्ति आली । भाऊ झाला पूर्ववत् ॥ ९४॥

दर्शना गेला शेगांवास । तों समर्थ वदले ऐसें त्यास ।
माझ्या गाडीबैलास । नुसता न चारा दिलास तूं ॥ ९५॥

हें सांकेतिक भाषण । कळलें भाऊलागून ।
हृदय आलें उचंबळून । त्या भाऊ कवराचें ॥ ९६॥

त्या रात्रीचा ब्राह्मण । खचित माझा गजानन ।
लेंकरासाठीं धांवून । खामगांवास आला हो ॥ ९७॥

कवरें केलें अन्नदान । त्या व्याधीच्या निमित्त जाण ।
अंतर्ज्ञानी असती पूर्ण । श्रीगजानन अवलिया ॥ ९८॥

असो एकदां समर्थस्वारी । निघती झाली पंढरपुरीं ।
त्या श्रीचंद्रभागेतीरीं । विठ्ठलासी भेटावया ॥ ९९॥

होती मंडळी बरोबर । दिवस वारीचा साचार ।
स्पेशल गाड्या वरचेवर । जाऊं लागल्या पंढरीला ॥ १००॥

जगू आबा पाटील हरी । बापुना व मंडाळी दुसरी ।
सोडूनिया शेगांव नगरी । नागझरीला आले हो ॥ १॥

त्या गांवीं माळावर । आहे एक भुयार ।
येथें गोमाजी नामें साधुवर । समाधिस्त झालासे ॥ २॥

READ  श्री गजानन विजय ग्रंथ - अध्याय एकोणिसावा

झरे जिवंत पाण्याचे । आसपास त्या माळाचे ।
आहेत म्हणून गांवाचें । नांव पडलें नागझरी ॥ ३॥

हा गोमाजी बोवा साचा । गुरु महादाजी पाटलाचा ।
प्रथम आशीर्वाद झाला साचा । शेगांवींच्या पाटीलवंशा ॥ ४॥

म्हणून पाटील शेगांवचे । गोमाजीला वंदून साचे ।
रस्त्यास लागती पंढरीचे । ऐसा त्यांचा परिपाठ ॥ ५॥

या परिपाठे म्हणून । नागझरीसी येऊन ।
अग्निरथांत बैसून । निघते झाले पंढरीला ॥ ६॥

हरीपाटला बरोबरी । समर्थाची होती स्वारी ।
बापुना आणि दुसरीं । माणसें पांचपन्नास ॥ ७॥

आषाढ शुध्द नवमीचा । तो दिवस होता साचा ।
समुदाय वारकर्‍यांचा । येऊं लागला पंढरीसी ॥ ८॥

मेघ दाटले अंबरीं । क्वचित् कोठें भूमीवरी ।
पर्जन्याची वृष्टी खरी । होऊं लागली श्रोते हो! ॥ ९॥

तें भुवैकुंठ पंढरपुर । गजबजून गेलें फार ।
भरतीं येतां सागर । जेवीं जाय उचंबळोनी ॥ ११०॥

प्रदक्षणेच्या रस्त्यावरी । टाळांची ती गर्दी खरी ।
‘ जय जय रामकृष्ण हरी ‘ । भक्त म्हणती उच्च स्वरें ॥ ११॥

शब्द कवणाचा कवणाला । न ये ऐकावयाला ।
ऐसा आनंदी आनंद चालला । तो वानूं कोठवर ॥ १२॥

नाथ निवृत्ति ज्ञानेश्वर । सांवता गोरा कुंभार ।
श्रीतुकोबा देहूकर । सोपान मुक्ता जनार्दन ॥ १३॥

या संतांच्या पालख्या । पंढरीस आल्या देखा ।
भक्तांनीं उधळिला बुक्का । आदर करायाकारणें ॥ १४॥

त्यायोगें आकाशांत । बुक्क्याचें जणूं झालें छत ।
सुवास उठला घमघमीत । गर्दी तुळशीफुलांची ॥ १५॥

श्रोते त्या समयाला । सम आले पंढरीला ।
उतरले जाऊन वाड्याला । त्या कुकाजी पाटलाच्या ॥ १६॥

हा प्रदक्षणेच्या वाटेवरी । वाडा चौफाळ्याशेजारीं ।
दर्शनाला भीड खरी । झाली असे राउळांत ॥ १७॥

पोलिस हाताहातावरी । उभे राहिले रस्त्यांतरीं ।
पथें चालले वारकरी । भजन करीत हरीचें ॥ १८॥

एकादशीस साचार । हरी पाटलाबरोबर ।
बापुनाविना इतर । गेले दर्शना हरीच्या ॥ १९॥

बापुना मागें राहिला । तो होता स्नानासी गेला ।
म्हणून त्यासी वेळ झाला । मंडळी गेली निघून ॥ १२०॥

स्नान करून आला घरीं । तों समजलें ऐशापरी ।
दर्शनासी गेली सारी । आतांच मंडळीं विठ्ठलाच्या ॥ २१॥

मग तोही निघाला पळत पळत । दर्शनाचा धरून हेत ।
राउळाच्या भोंवतीं अमित । गर्दी झाली लोकांची ॥ २२॥

मुंगीस वाट मिळेना । तेथें हा बापुना ।
केवीं जाईल दर्शना । शिवाय गरिबी पदरांत ॥ २३॥

बापुना म्हणे मानसीं । हे विठ्ठला हृषीकेशी ।
कां रे निष्ठुर झालासी? । मजला देई दर्शन ॥ २४॥

तूं सांवत्या माळ्याकारण । अरणीं गेलास धांवून ।
तेवीं येई राउळांतून । मज भेटाया पांडुरंगा ॥ २५॥

‘ अरण ‘ होते आठ कोस । तैसें नव्हें येथें खास ।
मी मंदिराच्या सान्निध्यास । उभा आहे वाटेवरी ॥ २६॥

तुला लोक म्हणतात । तूं अनाथांचा असशी नाथ ।
मग कां रे देवा मजप्रत । उपेक्षिलें या वेळीं? ॥२७॥

ऐसा बहुत धांवा केला । शेवटीं बापुना हताश झाला ।
परत बिर्‍हाडासी आला । अस्तमानाचे समयास ॥ २८॥

मुख झालें होतें म्लान । अवघ्या दिवसांचें उपोषण ।
बापुनाचें अवघें मन । विठ्ठलाकडे लागलें ॥ २९॥

शरीर मात्र होतें घरीं । मन मंदिराच्या सभोंवरी ।
फिरत होतें भिरीभिरी । याचें नांव ध्यास हो ॥ १३०॥

बापुनासी पाहून । हंसूं लागले अवघेजण ।
हा बेटा अभागी पूर्ण । कळून आला आपणां ॥ ३१॥

शेगांवाहून दर्शना । पंढरीसी आला जाणा ।
येथें येऊन खेळ नाना । फिरला पाहात गांवामध्यें ॥ ३२॥

याची दांभिक अवघी भक्ति । यास कशाचा श्रीपती? ।
ऐन वेळेला राहती । गैरहजर दुर्दैवी! ॥ ३३॥

कोणी म्हणाले बापुनाला । वेदान्त आहे अवघा आला ।
तो कशाशीं दर्शनाला । जाईल सांगा राउळांत ॥ ३४॥

त्याचा भगवंत हृदयांत । आहे सर्वदा खेळत ।
वेदान्त्याचें ऐसें मत । दगडामाजीं काय आहे? ॥ ३५॥

आपण वेडे म्हणून । घ्याया गेलों दर्शन ।
बापुनाचा नारायण । वाटेल तेथें उभा असे ॥ ३६॥

मग दुसरा म्हणाला । मग हा येथें कशास आला? ।
कां शेगांवीं तयाला । भेटला नसता ईश्वर? ॥ ३७॥

अहो हे वेदान्ती । लोकां ज्ञान सांगती ।
शब्द चावटी हमेश करिती । अनुभवाचा लेश नसे ॥ ३८॥

सगुणोपासना झाल्या पूर्ण । मग होणार आहे ज्ञान ।
न आल्यासी लहानपण । तरुणपणा येतो कसा? ॥ ३९॥

ऐसा उपहास तयाचा । प्रत्येकानीं केला साचा ।
अवघ्यांपुढें एकट्याचा । टिकाव लागावा कुठूनी? ॥ १४०॥

तो बापुना बसला उपोषित । दातांसी लावूनी दांत ।
ते होते अवघे पहात । स्वामी निजल्या जागाहून ॥ ४१॥

गरीबाचें सांकडें । साधूलाच एक पडे ।
सत्संगती ज्याला घडे । तेच खरे भाग्यवान ॥ ४२॥

समर्थ म्हणती बापुना । दुःख नको करूंस मना ।
ये तुला रुक्मिणीरमणा । भेटवितों ये काळीं ॥ ४३॥

तों महाराज उभे राहिलें । कटीं हात ठेविलें ।
पाय खालीं जुळविलें । समचरण दावावया ॥ ४४॥

तुळशीफुलांच्या माळा कंठीं । मूर्ति सांवळी गोमटी ।
बापुनाच्या पडली दृष्टी । शीर ठेविलें पायांवर ॥ ४५॥

पुन्हां जो पाहे वरीं । समर्थ दिसले पहिल्यापरी ।
तेणें बापुनाच्या अंतरीं । अति आनंद जाहला ॥ ४६॥

धोतर, पागोटें आणि शेला । जो घरीं दृष्टि पडिला ।
तोच त्यानें पाहिला । दर्शना जातां राउळांत ॥ ४७॥

इतर म्हणाले महाराजांस । तसेंच दर्शन आम्हांस ।
होऊं द्या आम्हां आहे आस । पुनरपि श्रीच्या दर्शनाची ॥ ४८॥

ऐसें ऐकतां भाषण । बोलते झाले गजानन ।
बापुनासारिखें आधीं मन । तुम्ही करा रे आपुलें ॥ ४९॥

तें तसें झाल्यावरी । दर्शन घडवीन निर्धारीं ।
ही दर्शन वस्तु खरी । काय मिळे बाजारांत? ॥ १५०॥

म्हणून ती आणून । देऊं तुम्हांकारण ।
निष्पाप करा आधीं मन । तरीच पुढचें घडेल हें ॥ ५१॥

पहा समर्थांनीं बापुनाला । विठ्ठल साक्षात् दाखविला ।
कुकाजीच्या वाड्याला । संतत्व हा खेळ नसे ॥ ५२॥

संत आणि भगवन्त । एकरूप साक्षात ।
गुळाच्या त्या गोडीप्रत । कैसें करावें निराळें? ॥ ५३॥

काला घेऊन अखेरी । मंडळी फिरली माघारी ।
बापुनाच्या अंतरीं । दर्शन तें ठसावलें ॥ ५४॥

READ  श्री गजानन विजय ग्रंथ - अध्याय बारावा

याच पुण्यें करून । पुत्र झाला त्याकारण ।
रसिक चतुर विद्वान । संतसेवा न जाई वृथा ॥ ५५॥

पंढरीच्या प्रसादानें । पुत्र झाला त्याकारणें ।
म्हणूनच नांव त्यानें । ठेविलें नामदेव बालकासी ॥ ५६॥

कवठे बहादूर गांवाचा । एक माळकरी होता साचा ।
तो वर्‍हाडप्रांतीचा । म्हणून उतरला वाड्यांत ॥ ५७॥

तेथें आषाढी द्वादशीसी । मरी आली मुक्कामासी ।
त्या पंढरपुरक्षेत्रासी । मग काय विचारितां? ॥ ५८॥

प्रेतामागें चाले प्रेत । पोलिस शिरती घरांत ।
यात्रा काढून देण्याप्रत । डाँक्टराच्या हुकुमानें ॥ ५९॥

वारकर्‍याला ओढिती । गाडीमाजीं बसविती ।
चंद्रभागेच्या पार करिती । कुर्डुवाडी रस्त्याला ॥ १६०॥

हा कवठे बहादूरचा वारकरी । झाला मरीनें आजारी ।
ढाळ होती वरच्यावरी । उलटी मुळींच थांबेना ॥ ६१॥

गोळे हातांपायांसी । येऊं लागले बहुवशी ।
कोण न जाई त्याजपाशीं । शुश्रुषा त्या करावया ॥ ६२॥

पोलिसभयानें हें वृत्त । कळविलें ना कोणाप्रत ।
शेगांवीचे समस्त । लोक जाया निघाले ॥ ६३॥

वाडा घटकेंत मोकळा झाला । हा वारकरी मात्र होता पडला ।
कठीण काळच्या समयाला । कोणी न येती उपयोगी! ॥ ६४॥

लोक सुखाचे सोबती । संकटकालीं अव्हेरिती ।
तेथें एक रक्षण करती । संत अथवा देव हो ॥ ६५॥

तो पाहून प्रकार । श्रीगजानन साधुवर ।
म्हणाले हा ओसरीवर । निजला यास घेऊन चला ॥ ६६॥

लोक म्हणती गुरुराया! । हा बहुतेक मेला सदया ।
याच्या नादीं लागतां वायां । संकट येईल आपणांतें ॥ ६७॥

पन्नास माणूस बरोबर । आपल्या येधवां साचार ।
मरीचा तो झाला जोर । सांप्रत या पंढरीसी ॥ ६८॥

अशा स्थितींत ये ठाई । थांबणें हें कांहीं बरें नाहीं ।
चला जाऊं लवलाही । चंद्रभागेच्या पलीकडे ॥ ६९॥

तों महाराज म्हणती अवघ्यांला । तुम्ही कैसें खुळावला? ।
आपल्या देशबंधूला । सोडितां हें बरें नव्हे! ॥ १७०॥

ऐसें वाटून जवल गेले । वारकर्‍याला करा धरलें ।
त्यासी उठून बसविलें । आणि केलें मधुरोत्तर ॥ ७१॥

चाल बापा ऊठ आतां । जाऊं आपल्या वर्‍हाडप्रांता ।
वारकरी म्हणे गुरुनाथा! । आतां वर्‍हाड कशाचें हो? ॥ ७२॥

समीप आला माझा अंत । जवळ नाहीं कोणी आप्त ।
तई म्हणाले सद्गुरुनाथ । वेड्या! ऐसा भिऊं नको ॥ ७३॥

तुझें टळलें गंडांतर । ऐसें वदोन ठेविला कर ।
त्या वारकर्‍याच्या शिरावर । ढाळ उलटी बंद झाली ॥ ७४॥

वाटूं लागली थोडी शक्ति । उभा राहिला त्वरित गती ।
संतानें ज्या धरिलें हातीं । त्यातें निजमनें यम नेई कसा? ॥ ७५॥

घटकेंत झाला पहिल्यापरी । मंडळीच्या बरोबरी ।
चंद्रभागेच्या पैलतीरीं । आला समर्थासमवेत ॥ ७६॥

आनंद झाला फार त्यासी । वंदी समर्थचरणांसी ।
म्हणे दयाळा काढिलें मशी । दाढेंतून काळाच्या ॥ ७७॥

ऐसा घडतां चमत्कार । भक्त करिती जयजयकार ।
आले कुर्डुवाडीवर । निर्धास्तपणें सर्वही ॥ ७८॥

पंढरीची करून वारी । आली शेगांवाप्रती सारी ।
मंडळी ती बरोबरी । श्रीगजाननस्वामीच्या ॥ ७९॥

एक कर्मठ ब्राह्मण । घ्याया आला दर्शन ।
त्या शेगांवाकारण । श्रीगजाननस्वामींचें ॥ १८०॥

तयानें स्वामीची कीर्ति । निजदेशीं ऐकिली होती ।
म्हणून आला दर्शनाप्रती । फार लांबून त्या ठायां ॥ ८१॥

सोवळें ओंवळें त्याचें अती । तो होता मध्वमती ।
खट्टू झाला परम चित्तीं । समर्थासी पाहातां ॥ ८२॥

व्यर्थ आलों म्हणे येथ । या वेड्यासी वंदण्याप्रत ।
हा भ्रष्टाचा आहे सत्य । सार्वभौम शिरोमणी ॥ ८३॥

सोंवळें ओंवळें येथ मेलें । अनाचाराचें राज्य झालें ।
अशा पिशाला म्हणूं लागले । साधू लोक हाय हाय ॥ ८४॥

तो तया मठांत । काळें कुत्रें झालें मृत ।
पडलें होतें त्याचें प्रेत । येण्याजाण्याच्या वाटेवरी ॥ ८५॥

त्या श्वानातें पाहून । ब्राह्मण झाला मनीं खिन्न ।
आणूं कसें जीवन । श्वान मध्यें पडला हा ॥ ८६॥

याला न कोणी उचलीती । गांजा सदैव धुनकिती ।
या वेड्यातें वंदिताती । “महाराज, महाराज,” म्हणून ॥ ८७॥

जळो याचें साधुपण । मला बुध्दि कोठून ।
झाली याचें दर्शन । घ्याया कांहीं कळेना ॥ ८८॥

त्याचा संशय फेडावया । समर्थ आसन सोडोनियां ।
येते झाले तया ठायां । जेथें होता ब्राह्मण ॥ ८९॥

आणि म्हणाले तयाप्रत । पूजा करावी यथास्थित ।
कुत्रें झालें नाहीं मृत । संशय उगा घेऊं नका ॥ १९०॥

तें ऐकून रागावला । निज समर्था बोलूं लागला ।
अरे नाहीं वेड मला । तुझ्यासम लागलेलें ॥ ९१॥

कुत्रें मरून झाला प्रहर । त्याचें प्रेत रस्त्यावर ।
पडलें याचा विचार । तुम्हीं न कोणी केला कीं ॥ ९२॥

ऐसें बोलतां विप्राला । समर्थांनीं जाब दिला ।
आम्ही भ्रष्ट आम्हांला । तुमच्यासम ज्ञान नाहीं ॥ ९३॥

परी खंति न करा तिळभर । पाणी आणाया घागर ।
घेऊन चलावें सत्वर । माझ्यामागें विप्रवरा ॥ ९४॥

ऐसें बोलून कुत्र्यापासीं । येते झाले पुण्यराशी ।
स्पर्श पदाचा करतां त्यासी । कुत्रें बसलें उठोन! ॥ ९५॥

तों पाहता चमत्कार । ब्राह्मण झाला निरुत्तर ।
म्हणे याचा अधिकार । थोर आहे देवापरी ॥ ९६॥

मी व्यर्थ निंदा केली । योग्यता ना जाणली ।
ऐसें म्हणून घातली । समर्थाच्या मिठी पायां ॥ ९७॥

माझे अपराध गुरुवरा! । आज सारे क्षमा करा ।
वरदहस्त ठेवा शिरा । मी अनंत अपराधी ॥ ९८॥

तूंच सोंवळा साचार । एक आहेस भूमीवर ।
करण्या जगाचा उध्दार । तुम्हां धाडिलें ईश्वरानें ॥ ९९॥

श्रोते त्याच दिवशीं भली । समाराधना त्यानें केली ।
कुशंका मनाची पार फिटली । लीन झाला अत्यंत ॥ २००॥

प्रसाद घेऊन गेला परत । आपुल्या तो देशाप्रत ।
समर्थ साक्षात् भगवंत । ऐसी प्रचीति आली तय ॥ १॥

स्वस्ति श्रीदासगणूविरचित । हा गजाननविजय नामें ग्रंथ ।
भाविकां लाभो सत्पथ । हेंचि इच्छी दासगणू ॥ २०२॥

शुभं भवतु ॥ श्रीहरिहरार्पणमस्तु ॥

॥ इति अष्टादशोऽध्यायः समाप्तः ॥

(PDF) Download श्री गजानन विजय ग्रंथ – अध्याय अठरावा

श्री गजानन विजय ग्रंथ अध्याय १८ वा Shri Gajanan Vijay Granth Adhyaya 18 sgvg
श्री गजानन विजय ग्रंथ – अध्याय अठरावा

श्री गजानन विजय ग्रंथ – अध्याय एकोणिसावा वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

टीप: माहिती शोधण्यासाठी आणि लिहिण्यासाठी योग्य ती काळजी घेण्यात आली आहे. तरी तुम्हाला काही त्रुटी आढळल्यास कृपया कंमेंट्सद्वारे किंवा कॉन्टॅक्ट फॉर्म द्वारे आम्हाला कळवा.

Leave a Comment

Share via
Copy link