Sant Narhari Sonar | संत नरहरी सोनार (माहिती)

मागील पोस्ट मध्ये आपण संत श्री नरहरी महाराज यांचे उपलब्ध असलेले अभंग पहिले. या भागात आपण संत नरहरी सोनार यांचे जीवन चरित्र पाहणार आहोत.

परिचय

संत नरहरी सोनार (Sant Narhari Sonar) हे १३ व्या शतकातील वारकरी संप्रदायातील प्रथम शैव उपासक होते.  एकदा शिव आणि विठ्ठल एकच आहेत असा त्यांना साक्षात्कार झाला आणि त्यांनी आपला जीवनमार्ग विठ्ठलमय करून टाकला. अठरापगड जाती जमातीच्या संतांनी एकत्र येऊन वारकरी संप्रदाय वाढविण्याचा प्रयत्न केला आहे. यात पंढरपूरमधील संत नरहरी सोनार यांनी आपल्या भक्तीचा ठसा सर्वत्र उमटविला होता.

संत नरहरी महाराज यांचा जन्म पंढरपूर मध्ये एका सोनार कुटुंबात झाला. त्यांच्या वडिलांचे नाव श्री. अच्युतराव व आईचे नाव सावित्रीबाई असे होते. रामचंद्र-कृष्णदास-हरिप्रसाद-मुकुंदराज-मुरारी-अच्युत आणि नरहरी नारायण अशी त्यांची वंशपरंपरा सांगण्यात येते. ते वडिलोपार्जित सोन्याचा व्यवसाय करीत असल्यामुळे त्यांचे आडनाव सोनार असे झाले. संत नरहरी सोनार यांचे मुळ आडनाव महामुनी, गोत्र सनातन, शाखा यजुर्वेद विश्वब्राम्हण असून त्यांची समाधीची पूजा अर्चना त्यांचे वंशज महामुनी यांचे तर्फे केली जाते.

वयाचा सातव्या वर्षी नरहरी महाराजांचा यज्ञोपवित्र उपनयन संस्कार संपन्न झाला. गहिनीनाथ महाराजांकडुन गुरु उपदेश, नाथ संप्रदायाची दिक्षा आणि गायत्री मंत्र प्राप्त झाला.

साधारण १८ – २० वयाचे असताना त्यांचा विवाह गंगाबाई नावाच्या मुलीशी झाला. त्यांच्या मुलांची नावे मालू आणि नारायण होती.

संत नरहरी सोनार हे एक प्रसिद्ध शिवभक्त होते. त्यांच्या घरात शिवभक्ती परंपरेने चालत आली होती. त्यांच्या या भक्तीची चर्चा पंढरपुरामध्ये मोठ्या प्रमाणावर होती. रोज सकाळी उठल्यावर ते शिव-आराधना करीत असे. रोज पहाटे जोतिर्लिंगावर ते बेलपत्र वाहत. ते कट्टर शिवभक्त असल्याने दुसऱ्या देवावर त्यांची फारशी श्रद्धा नव्हती, यामुळे काही लोकांना त्यांच्या या वृत्तीचा राग येत असे.

READ  Javavari Re Tavavari | जंववरी रे तंववरी

संत नरहरी महाराजांचे सर्व अभंग वाचण्यासाठी Abhang – Sant Narhari Sonar येथे क्लिक करा.

साक्षात्कार

संत नरहरी सोनार यांचा व्यवसाय दागिने बनवण्याचा होता. त्यांची कलाकुसर त्यावेळेस चांगली प्रसिद्ध होती. त्यांनी आपल्या कलेच्या जोरावर पंढरपुरात व्यवसायाचा चांगला जम बसविला होता.

गावात एका सावकाराला विठ्ठलाला नवस केल्यामुळे पुत्ररत्न झाले होते. त्यामुळे विठ्ठलासाठी कमरेची सोनसाखळी तयार करावी असे त्या सावकाराच्या मनात आले. संत नरहरी सोनार हे उत्तम कारागीर असल्याने त्यांनीच ती सोनसाखळी बनवावी म्हणून ते त्यांच्याकडे साखळी बनविण्यास आले.

पण संत नरहरी सोनार ह्यांनी स्पष्टपणे नकार दिला याचे कारण त्यांचा पण होता की शंकाराशिवाय इतर कोणत्याही देवतांचे मुख ते बघणार नाहीत. त्यावर निरुपाय म्हणून सावकाराने विठ्ठलाच्या कमरेचे माप आणून देण्याचे ठरवले. यावर संत नरहरी सोनार यांनी साखळी बनवण्यास होकार दिला.

दुसऱ्या दिवशी सावकाराने विठ्ठलाच्या कमरेचे माप आणून दिले. संत नरहरी यांनी आपल्या कलेप्रमाणे सुंदर सोनसाखळी तयार केली. सावकार देखील सोनसाखळी पाहून खुश झाला. मंदिरात जाऊन विठ्ठलाला सोन साखळी घातली. पण ती एक वीतभर जास्त झाली होती. म्हणून सावकाराने आपल्या सेवकाला संत नरहरी सोनार याच्याकडे पाठवले व साखळीचे माप बरोबर करून आणण्यास सांगितले. संत नरहरी सोनार यांनी साखळीचे माप त्याप्रमाणे करून दिले. परंतु विठ्ठलाला साखळी घातल्यावर पुन्हा माप जास्त झाले. यामुळे नरहरी सोनार गोंधळून गेले.

माप बरोबर देऊनही असे कसे होत आहे या विचारात ते पडले आणि शेवटी स्वतः मंदिरात गेले. स्वतःच्या डोळ्यावर पट्टी बांधून नरहरी सोनार विठ्ठलाच्या मूर्तीसमोर गेले व जेव्हा सोनसाखळी कमरेला बांधू लागले तेव्हा त्यांच्या हाताला व्याघ्र चर्म लागले. जेव्हा नरहरी सोनारांचे हात विठ्ठलाच्या मूर्तीच्या गळयापर्यंत गेले तर त्यांना गळ्यात शेष नाग असल्याचे जाणवले. नरहरी सोनार यांनी लगेच आपल्या डोळ्यावरील पट्टी काढली. बघतात तर काय समोर विठ्ठलाची मूर्ती होती. पुन्हा त्यांनी डोळ्यावर पट्टी बांधली परत पुन्हा तेच. यामुळे ते खूप गोंधळून गेले. शेवटी त्यांच्या लक्षात आले की पांडुरंग परमात्माच शंकर भगवान आहे. हे सर्व देव विठ्ठलातच सामावलेले आहेत. यानंतर ते विठ्ठलाच्या भक्तीमध्ये बुडून गेले व पांडुरंगला म्हणाले,

देवा तुझा मी सोनार । तुझे नामाचा व्यवहार ।।

निर्मळ निराकार परमात्मा तत्व नरहरींना सगुण साकार रूपात पांडुरंगाचे निस्सीम सेवा आणि भक्ती करु लागले तेव्हापासुन नरहरी सारखे विठ्ठलाच्या सान्नीध्यात मंदिरात बसून भजन कीर्तन करू लागले. त्यांची हि निस्सीम सेवा भक्ती पाहुन भगवान प्रसन्न झालेत. त्यांनी सगुण पांडुरंगा मध्ये निर्गुण निराकार परब्रह्म दिसु लागले. त्यांच्या अंतकरणात भगवान वास करू लागले.

READ  Javavari Re Tavavari | जंववरी रे तंववरी

पुढे संत नरहरी सोनार यांनी विठ्ठलाच्या भक्ती मध्ये अभंग लिहिले. त्यांचे फार थोडे अभंग उपलब्ध आहेत. त्यातील ‘देवा तुझा मी सोनार’, शिव आणि विष्णू एकचि प्रतिमा’, ‘माझे प्रेम तुझे पायी’, इत्यादी अभंग प्रसिद्ध आहेत.

अन्नपूर्णा स्तोत्र वाचण्यासाठी Annapurna Stotra | अन्नपूर्णा स्तोत्र  येथे क्लिक करा.

अभंगातील शिकवण

नरहरी सोनार यांचे अभंग क्षणिक आणि अवास्तविक जगाबद्दल बोलतात. ज्याप्रमाणे मुले दगडी घरे बांधतात आणि नंतर ती टाकून देतात, त्याचप्रमाणे लोक जगाच्या व्यवहारात गुंततात आणि नंतर मरुन जातात.

दुसऱ्या एका अभंगात ते गुरूचे महत्त्व सांगतात. जसे हत्ती अंकुशाच्या नियंत्रणात असतो आणि वाघ पिंजऱ्यात असतो, नरहरी आपले गुरु गहिनीनाथ यांच्यामुळे नियंत्रणात आले असे सांगतात. नरहरी स्वतःच्या अनुभवाने सांगतात की हा आवाज माणसाला भगवंताच्या खऱ्या प्रेमाने भरून त्याच्याकडे घेऊन जातो.

नरहरीने एका अभंगात आपल्या व्यवसायाचा सोनार असा उल्लेख केला आहे. तो स्वतःला सोनार म्हणवून घेतो जो देवाच्या नावाने व्यवहार करतो. नरहरीचे शरीर हे त्याच्या आत्म्यासाठी सोन्याचे वितळणारे पात्र आहे. तीन गुणांच्या ठिकाणी तो भगवंताचा रस ओततो. तो राग आणि वासना जीवनातून काढून टाकतो. विवेकाच्या कात्रीने तो भगवंताच्या नामाचे सोन्याचे पान तोडतो. तो आध्यात्मिक ज्ञानाच्या तराजूच्या भगवंताचे नाव मोजतो.

समाधी

नंतरच्या काळात नरहरी महाराज संसारासंबंधी पुर्णपणे अनासक्त झाले. ते ब्रम्हस्थितीला प्राप्त झालेले होते. नरहरी महाराजांचा हा ज्ञानदीप आता वैकुंठाच्या मर्गावर प्रज्वलीत झाला होता.

संत नरहरी सोनार देवाचे नामस्मरण करता करता समाधिस्थ झाले व आपली प्राणज्योत विठ्ठलामध्ये एकरूप केली. तो दिवस होता माघ वद्य तृतीया सोमवार.

त्याकाळी समाधीचा खुप मोठा उत्सव साजरा करण्यात आला साक्षात मायबाप विठ्ठल रुक्मिणी सहीत संत ज्ञानदेव, संत निवृत्ती, संत चोखामेळा, संत नामदेव उपस्थित होते. शेवटी

निवृत्ती मुख धरिले । ज्ञानदेवा करविले पूजन नरहरीचे।।

१० दिवस कथा कीर्तन होते शेवटी दशक्रिया विधी जेवन दिले. समाधी पंढरपूर येथे विठ्ठल मंदिरा समोर महाद्वारात मल्लीकार्जुन मंदिरा शेजारी आहे. सर्वात वयोवृद्ध संत म्हणून नरहरी महाराजांना पहिले जाते. अंतसमयासी ते ९२ वर्षाचे होते तेव्हा संत ज्ञानेश्वर १२ व संत नामदेव ४२ वयाचे होते.

READ  Abhang - Sant Narhari Sonar | अभंग - संत नरहरी सोनार

पुण्यतिथी

संपुर्ण भारतभर व विदेशात सर्व संप्रदायात माघ कृष्ण तृतीयेला पुण्यतिथी ( हरिएैक्य दिन) साजरी केली जाते.

माघ कृष्ण तृतीयेला श्री संत नरहरी महाराज पुण्यतिथी महोत्सव होतो. सर्व शाखीय सुवर्णकार समाज भक्ती भावाने पुजन व उत्सव साजरा करतो.

टीप: जन्म, मृत्यु आणि जीवनातील विविध घटनांच्या तारखांचा मेळ बसत नसल्या कारणाने तारखा नमूद केलेल्या नाहीत.

संत नरहरी महाराजांचे सर्व अभंग वाचण्यासाठी Abhang – Sant Narhari Sonar येथे क्लिक करा.
पसायदान वाचण्यासाठी Pasaydan येथे क्लिक करा.

टीप: माहिती शोधण्यासाठी आणि लिहिण्यासाठी योग्य ती काळजी घेण्यात आली आहे. तरी तुम्हाला काही त्रुटी आढळल्यास कृपया कंमेंट्सद्वारे किंवा कॉन्टॅक्ट फॉर्म द्वारे आम्हाला कळवा.

Leave a Comment